
जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यामध्ये रविवारी यात्रेकरुंच्या बसवर भीषण दहशतवादी हल्ला झाला. यात 10 निष्पाप यात्रेकरुंचा मृत्यू झाला. 33 जण जखमी झाले. शिवखोरी येथे दर्शन घेऊन यात्रेकरु कटराला चालले होते. त्यावेळी जवळपासच्या जंगलात दबा धरुन बसलेले दहशतवादी अचानक समोर आले व त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. बसच्या ड्रायव्हरला गोळी लागली. त्यामुळे स्टेअरिंगवरील त्याचं नियंत्रण सुटलं व बस खोल दरीत कोसळली. रियासी जिल्ह्यात हा हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भागात सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA ला तपास करण्याचे गृहमंत्रालयाने निर्देश दिले आहेत. दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी या जंगल पट्ट्यात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरु झाली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरुंच्या बसवर झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ने स्वीकारली आहे. TRF ला पाकिस्तानाच समर्थन आहे. हल्ला झाला त्या ठिकाणी शोध कार्यात ड्रोन्सची मदत घेण्यात आली आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबचे तज्ज्ञ या तपासकार्यात सहभागी झाले आहेत. या हल्ल्यातील बहुतांश पीडित उत्तर प्रदेश, राजस्थानमधील आहेत. बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टरचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांची ओळख पटली आहे. ड्रायव्हर विजय कुमार आणि कंडक्टर अरुण कुमार दोघे रियासी जिल्ह्याचे निवासी आहेत.
कसा झाला हल्ला?
जखमींमध्ये पाच दिल्लीचे आणि दोन राजस्थानचे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन ते तीन दहशतवाद्यांचा या हल्ल्यामध्ये सहभाग आहे. मागच्या महिन्यात राजौरी आणि पूँछमध्ये ज्या दहशतवाद्यांनी हल्ले घडवून आणले, तेच यामागे आहेत. रविवारी दहशतवादी घनदाट झुडपात लपले होते. अचानक समोर येऊन त्यांनी गोळीबार सुरु केला.