आधी म्हणाले अॅलोपॅथीने लाखो लोकांचा जीव घेतला, देशभरातून टीकेनंतर रामदेव बाबांकडून वक्तव्य मागे

| Updated on: May 24, 2021 | 4:16 AM

रामदेव बाबांनी माफी मागणं टाळत आपलं वक्तव्य मागे घेतल्याचं ट्विट केलं. तसेच हा वाद संपवण्याचं आवाहन केलं.

आधी म्हणाले अॅलोपॅथीने लाखो लोकांचा जीव घेतला, देशभरातून टीकेनंतर रामदेव बाबांकडून वक्तव्य मागे
योगगुरु रामदेव बाबा
Follow us on

नवी दिल्ली : रामदेव बाबा यांनी अॅलोपॅथीमुळे लाखो लोकांचे जीव गेल्याचं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर देशभरातून टीका झाली. इंडियन मेडिकल काऊंसिलने केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे कायदेशीर कारवाईची मागणी केली. यानंतर वाढता दबाव लक्षात घेऊन हर्षवर्धन यांनी देखील रामदेव बाबांना खरमरीत पत्र लिहिलं. त्यानंतर रामदेव बाबांनी माफी मागणं टाळत आपलं वक्तव्य मागे घेतल्याचं ट्विट केलं. तसेच हा वाद संपवण्याचं आवाहन केलं (Ramdev Baba take back his controversial statement on Allopathy and Corona death).

रामदेव बाबांनी आपल्या ट्विटसोबत आपली भूमिका मांडणारं एक पत्र जोडलं आहे. हे पत्र त्यांनी आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना पाठवलंय. यात त्यांनी लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर खेद असल्याचं म्हटलं. ते म्हणाले, “आमचा आधुनिक चिकित्सेला किंवा अॅलोपॅथीला विरोध नाही. माझं जे वक्तव्य कोट केलं जातंय ते कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्हॉट्सअॅप मेसेजमधील आहे. त्यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो.”

“कोणत्याही चिकित्सा पद्धतीतील दोष दाखवणे हे त्यावरील आक्रमण अशा अर्थाने घेऊ नये. सर्वांना आत्मचिंतन करायला हवं. अॅलोपॅथीने कोट्यावधी लोकांचा जीव वाचवला, तसा आयुर्वेद आणि योगाने देखील कोट्यावधी लोकांचा जीव वाचवला आहे. त्याचाही आदर व्हावा.”

रामदेव बाबा काय म्हणाले होते?

रामदेव बाबा या व्हिडीओत सुरुवातील एक मेसेज वाचून दाखवतात. यात ते वाचतात, “आश्चर्यकारक तमाशा आहे. अॅलोपॅथी मुर्खपणाचं आणि दिवाळखोर विज्ञान आहे. आधी रेमडेसिवीर फेल ठरलं, नंतर अँटिबायोटिक्स फेल झालं, नंतर स्टेरॉईड फेल झाले, प्लाझ्मा थेरपीवरही बंदी घालण्यात आली.”

यानंतर ते या मेसेजवर बोलताना म्हणतात, “तापावर दिलं जाणारं फॅबीफ्ल्यू देखील निकामी ठरलंय. जेवढे औषधं देत आहेत त्या सर्वांचं हेच होत आहे. त्यामुळे लोक हा काय तमाशा सुरु आहे असं म्हणत आहेत. त्यांची तापावरील कोणतंही औषध काम करत नाहीये. कारण ते शरीराचं तापमान कमी करत आहेत. मात्र, ज्या विषाणूमुळे, बुरशीमुळे ताप येत आहे त्याचा यांच्याकडे इलाज नाही. तर मग हे कसं बरं करणार?”

“लाखो लोकांच्या मृत्यूचं कारण अॅलोपॅथी”

“म्हणूनच मी खूप मोठं विधान करतो आहे. काही लोक यावर वाद करतील. अॅलोपॅथीचं औषधं खाल्ल्याने लाखो लोकांचा मृत्यू झालाय. जितक्या लोकांचा मृत्यू रुग्णालयात न केल्यानं किंवा ऑक्सिजन न मिळाल्यानं झालाय त्यापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू ऑक्सिजन आणि अॅलोपॅथीची औषधं दिल्यानंतर झालाय. स्टेरॉईडमुळे मृत्यू झालाय. लाखो लोकांच्या मृत्यूचं कारण अॅलोपॅथी आहे.”

IMA कडून रामदेवबाबांना कायदेशीर नोटीस

रामदेव बाबांच्या आश्रेपार्ह वक्तव्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने (Indian Medical Association) त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली. तसेच ते लोकांची दिशाभूल करत असल्याचं सांगितलं.

हेही वाचा :

योगगुरु रामदेव बाबांविरुद्ध गुन्हा दाखल करा, IMA आक्रमक

पतंजलीचं औषध कोरोनापासून संरक्षण असेल तर मग लसीकरणावर 35 हजार कोटींचा खर्च का? : IMA

गोबर, गोमूत्र आणि रामदेव ही थेरपी बंद करा; नवाब मलिक कडाडले

व्हिडीओ पाहा :

Ramdev Baba take back his controversial statement on Allopathy and Corona death