‘काँग्रेसच्या 50 वर्षाच्या काळातील विनाशकारी नितीमुळेच शेतकरी गरीब’, जावडेकरांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

| Updated on: Jan 19, 2021 | 7:40 PM

बुधवारी केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये चर्चेही दहावी फेरी होणार आहे. कुठल्याही परिस्थितीत ही चर्चा यशस्वी होऊ नये, असा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप जावडेकर यांनी केला आहे.

काँग्रेसच्या 50 वर्षाच्या काळातील विनाशकारी नितीमुळेच शेतकरी गरीब, जावडेकरांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर
Follow us on

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात ‘खेती का खून’ नावाने एक बुकलेट जारी केलं आहे. त्याला आता केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जोरदार पलटवार केला आहे. बुधवारी केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये चर्चेही दहावी फेरी होणार आहे. कुठल्याही परिस्थितीत ही चर्चा यशस्वी होऊ नये, असा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप जावडेकर यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा निघावा, अशी काँग्रेसची इच्छा नाही. काँग्रेसला खून या शब्दाबाबत जास्ती प्रेम आहे. तुम्ही ‘खेती का खून’ असं म्हणत आहात, पण तुम्ही देशाच्या विभाजनावेळी हत्येचा खेळ खेळला, त्यावेळी लाखो लोकांचा मृत्यू झाला, ती हत्या नव्हती का? असा सवाल जावडेकर यांनी राहुल गांधींना विचारला आहे.(Prakash Javadekar’s strong response to Rahul Gandhi’s allegations)

प्रकाश जावडेकरांचा सवाल

काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे की, 4-5 परिवार देशावर हावी आहेत. पण असं नाही, देशावर आता कुठल्याही परिवाराची सत्ता नाही. देशावर 125 कोटी जनतेचं राज्य आहे आणि हे परिवर्तन मोदी सरकारमध्ये झालं असल्याचा टोलाही जावडेकर यांनी गांधी परिवाराला लगावला आहे. काँग्रेसनं देशावर तब्बल 50 वर्षे राज्य केलं. तेव्हा एकाच परिवाराची सत्ता होती. आज देशाचा शेतकरी गरीब आहे तर तो कुणाच्या नितीमुळे? 50 वर्षे काँग्रेसनं विनाशकारी निती अवलंबल्यामुळेच देशातील शेतकरी गरीब राहीला. त्याच्या उत्पादनाला कधीच योग्य भाव दिला गेला नाही, असा गंभीर आरोप प्रकाश जावडेकर यांनी राहुल गांधींवर केलाय.

राहुल गांधींचा आरोप काय?

राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली आहे. या तिन्ही कायदामुळे देशातील शेतकऱ्यांची वाट लागणार आहे, असं सांगतानाच मी मोदी सरकारला घाबरत नाही. हे लोक मला हात लावू शकत नाहीत. पण मला गोळी घालू शकतात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून भाजपवर घणाघाती टीका केली. तिन्ही कृषी कायदे शेतीची वाट लावणार आहेत. मी या कायद्यांचा विरोध करतो. आता मी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या प्रश्नांची उत्तरेच देणार नाही. ते काही माझे प्राध्यापक नाहीत. मी केवळ शेतकरी आणि देशाच्या प्रश्नांची उत्तरे देईन, असं राहुल गांधी म्हणाले. मोदी सरकारने टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांची वाट लावण्यास घेतली आहे. ते केवळ तीन कायद्यांवर थांबणार नाहीत तर शेतकऱ्यांची वाट लावूनच थांबणार आहेत. संपूर्ण देशाची शेती आपल्या तीन चार मित्रांच्या हवाली करण्याचा त्यांचा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला.

संबंधित बातम्या :

मला हात लावू शकत नाहीत, गोळी घालू शकतात; राहुल गांधींचा खळबळजनक आरोप

नड्डा कोण आहेत, ज्यांना उत्तर देत फिरू! : राहुल गांधी

Prakash Javadekar’s strong response to Rahul Gandhi’s allegations