केंद्रीय मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा, मोठं कारण आलं समोर
Ravneet Singh Bittu : नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामागील कारण समोर आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना आता नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार केंद्रीय त्यांचा राजीनामा तत्काळ प्रभावाने स्वीकारला आहे. हा निर्णय भारतीय संविधानाच्या कलम 75(2) अंतर्गत घेण्यात आला आहे.
राजीनाम्याचे कारण आले समोर
राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, रवनीत सिंह बिट्टू यांचा राजीनामा तात्काळ स्वीकारण्यात आला आहे. याचे कारण म्हणजे रवनीत सिंह बिट्टू यांचा राज्यसभेचा कार्यकाळ 21 जून रोजीच संपला होता. 18 जून रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपाने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे ते सध्या राज्यसभा किंवा लोकसभेचे सदस्य नाहीत. मात्र त्यानंतरही त्यांचा राजीनामा घेण्यात आला नव्हता. मात्र, आज त्यांचा राजीनामा अधिकृतपणे मंजूर करण्यात आला आहे.
कोण आहेत रवनीत सिंह बिट्टू?
रवनीत सिंह बिट्टू यांनी 24 मार्च 2024 रोजी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला होता. त्याआधी ते काँग्रेसमध्ये होते. 11 मार्च 2021 ते 18 जुलै 2021 या कालावधीत त्यांनी लोकसभेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ते 2009 मध्ये आनंदपूर साहिब, तर 2014 आणि 2019 मध्ये लुधियाना मतदारसंघातून लोकसभेसाठी निवडून आले होते. ते पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचे नातू आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात त्यांची रेल्वे राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
सिंघू सीमेवर झाला होता हल्ला
जानेवारी 2021 मध्ये ‘जन संसद’ कार्यक्रमादरम्यान सिंघू सीमेवर रवनीत सिंह बिट्टू यांच्यावर हल्ला झाला होता. यानंतर त्यांची लोकसभेत काँग्रेस पक्षाचे व्हिप म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच, मार्च 2021 मध्ये, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेले काँग्रेसचे तत्कालीन लोकसभा नेते अधीर रंजन चौधरी यांच्या अनुपस्थितीत बिट्टू यांनी काही काळ लोकसभेतील काँग्रेस पक्षनेते म्हणूनही काम केले होते.