वंदे भारत ट्रेन विदेशातील रेल्वे ट्रॅकवरही धावणार, रेल्वे मंत्र्यांनी सांगितले कधीपासून निर्यात होणार

vande bharat express | देशात सुरु झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला चांगले यश मिळाले. या यशानंतर आता वंदे भारत ट्रेनला विदेशातही मागणी सुरु झाली आहे. सध्या भारतात ८२ वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावत आहेत. तसेच आता वंदे भारत गाड्यांचा वेग वाढवण्याचे कामही सुरू असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

वंदे भारत ट्रेन विदेशातील रेल्वे ट्रॅकवरही धावणार, रेल्वे मंत्र्यांनी सांगितले कधीपासून निर्यात होणार
Vande bharat express
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Feb 17, 2024 | 7:55 AM

नवी दिल्ली, दि. 17 फेब्रुवारी 2024 | गेल्या काही वर्षांत भारतीय रेल्वेचा विकास वेगाने झाला आहे. वंदे भारत एक्स्प्रेस ही सेमी हायस्पीड ट्रेन प्रवाशांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे. भारतात या ट्रेनचे नेटवर्क वाढत आहे. महाराष्ट्रातील काही मार्गांवरुन वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. सध्या देशांत 82 वंदे भारत एक्‍सप्रेस धावत आहे. त्यात या वर्षभरात आणखी वाढ होणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसला भारतातच नव्हे तर विदेशातही मागणी वाढत आहे. सेमीहायस्पीड ट्रेन आणि अनेक सुविधांमुळे जगभरात वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांना आकर्षित करत आहे. यामुळे सरकार आता या ट्रेनची निर्यात करणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत संदर्भात विदेशातून मागणी आली आहे. लवकरच या ट्रेनची निर्यात सुरु होणार असल्याचे म्हटले आहे.

लवकर होणार निर्यात

एका कार्यक्रमात बोलताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, भारताने वंदे भारत ट्रेनला स्वदेशी डिझाइन आणि उत्तम कार्यक्षमतेसह तयार केली आहे. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील युनिट्सकडून तिचे काम झाले आहे. आपण भारतीय अभियंत्यांच्या मदतीने आपल्या देशात वंदे भारत ट्रेन तयार करण्याचे आव्हान पेलले आहे. आता ही ट्रेन येत्या काही वर्षांत निर्यात करण्यात येणार आहे.

भारतात सध्या ८२ वंदे भारत एक्सप्रेस

सध्या भारतात ८२ वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावत आहेत. तसेच आता वंदे भारत गाड्यांचा वेग वाढवण्याचे कामही सुरू असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. नवी दिल्ली-मुंबई आणि नवी दिल्ली-हावडा मार्गावर वंदे भारत गाड्या ताशी १६० किलोमीटर वेगाने धावण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी रेल्वे ट्रॅक चांगले केले जात आहे. एनडीए सरकार आल्यानंतर रोज १५ किलोमीटर रेल्वे ट्रॅक तयार होत आहे. यापूर्वी २००४ ते २०१४ दरम्यान रोज चार किलोमीटर रेल्वे ट्रॅक तयार होत होते. मागील दहा वर्षांत ४१ हजार किलोमीटर रेल्वे नेटवर्क तयार केला गेला आहे. २००४ ते २०१४ दरम्यान रेल्वेत गुंतवणूक १५ हजार ६७४ कोटी रुपये होती. ती २०२४-२६ दरम्यान २ लाख ५२ हजार कोटी रुपये झाली आहे.

वंदे भारत ही भारतातील नव्या युगाची ट्रेन आहे. ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत ही ट्रेन तयार करण्यात आली आहे. तिची प्रवासी वाहण्याची क्षमता ही ‘शताब्दी एक्स्प्रेस’ पेक्षा अधिक आहे.

हे ही वाचा

वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक, सहा कोचचे नुकसान, प्रवाशी दहशतीत