Vande Mataram : ‘जन गण मन’पूर्वी वंदे मातरमला मान, स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर ती परंपरा मोडणार
Vande Mataram : स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करण्यापूर्वी आणि राष्ट्रगीतापूर्वी ‘वंदे मातरम्’चे गायन केले जाणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

संपूर्ण देश सध्या स्वातंत्र्य दिनाच्या तयारीत व्यस्त आहे. 15 ऑगस्ट 2026 रोजी भारताचा 80वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्यापासून भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या लाल किल्ल्यावरील सोहळ्यात ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताचे सूर महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मात्र, यंदा प्रथमच या सोहळ्याचा क्रम बदलणार आहे. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करण्यापूर्वी आणि राष्ट्रगीतापूर्वी ‘वंदे मातरम्’चे गायन केले जाणार आहे. या बदलाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
संरक्षण मंत्रालयाने 2026 च्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याच्या कार्यक्रमात या नव्या क्रमाची अधिकृत घोषणा केली आहे. यंदाच्या स्वातंत्रदिनी ‘वंदे मातरम्’ ‘जन गण मन’च्या आधी गायले जाणार आहे. ‘जन गण मन’ हे भारताचे राष्ट्रगीत आहे. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने त्याचा स्वीकार केला. त्याला निश्चित कायदेशीर आणि औपचारिक दर्जा असून, निर्धारित प्रोटोकॉलनुसार सरकारी आणि राज्यस्तरीय कार्यक्रमांमध्ये ते वाजवले जाते. मात्र यंदा स्वातंत्रदिनी लाल किल्ल्यावर वंदे मातरम आधी गायले जाणार आहे.
‘वंदे मातरम्’ आधी का गायले जाणार?
लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाचा सोहळा एका निश्चित क्रमाने पार पडतो. पंतप्रधानांचे आगमन, तिरंगा फडकावणे, त्यानंतर राष्ट्रगीत आणि मग देशाला संबोधन, असा हा क्रम असतो. ‘वंदे मातरम्’ला या सोहळ्यात गाण्यावर कोणतीही कायदेशीर बंदी नव्हती; मात्र ते पारंपरिक कार्यक्रमाच्या क्रमाचा भाग नव्हते. यंदाच्या बदलामुळे ‘वंदे मातरम्’ला सोहळ्यात सुरुवातीचे आणि महत्त्वाचे स्थान मिळणार आहे.
यामागील कारण भारतातील या दोन महत्त्वाच्या देशभक्तिपर रचनांच्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आहे. ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत असून, त्याची रचना बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी केली. ब्रिटिशविरोधी स्वातंत्र्यलढ्यात या गीताला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. दुसरीकडे, ‘जन गण मन’ हे भारताचे राष्ट्रगीत आहे. 1950 मध्ये संविधान सभेने त्याचा स्वीकार केला आणि त्याचा वापर अधिकृत सरकारी समारंभांमध्ये केला जातो.
‘वंदे मातरम्’ आणि स्वातंत्र्य संघर्ष
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, ‘वंदे मातरम्’ हे स्वातंत्र्याच्या संघर्षाशी जोडलेले आहे, तर ‘जन गण मन’ हे स्वातंत्र्यानंतर अस्तित्वात आलेल्या सार्वभौम प्रजासत्ताक भारताचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे आता सोहळ्याचा क्रम राष्ट्रीय जागृतीपासून राष्ट्रीय स्वातंत्र्यापर्यंत आणि त्यानंतर घटनात्मक प्रजासत्ताकापर्यंत जाणारा असेल. ब्रिटिश सत्तेविरोधातील आंदोलने, मोर्चे, क्रांतिकारी चळवळी आणि राजकीय जनजागृतीमध्ये ‘वंदे मातरम्’चे सूर घुमत होते. भारताकडे संविधान, संसद किंवा राष्ट्रगीत अस्तित्वात येण्यापूर्वीपासूनच हे गीत गायले जात होते.
दुसरीकडे, ‘जन गण मन’ हे प्रजासत्ताक भारताच्या अधिकृत आवाजाचे प्रतिनिधित्व करते. ‘वंदे मातरम्’ला आधी स्थान देऊन सरकार प्रतीकात्मकरीत्या असा संदेश देत आहे की, भारताची भावनिक आणि राष्ट्रीय संकल्पना ही घटनात्मक भारताच्या निर्मितीपूर्वीची आहे. यंदाच्या बदलाची वेळही महत्त्वाची आहे. 2026 मधील स्वातंत्र्यदिनाचा सोहळा भारताच्या स्वातंत्र्याची 80 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर होत आहे. लाल किल्ल्यावरील कार्यक्रमासाठी सरकारने ‘युवा शक्ती’ ही संकल्पना निवडली आहे. तरुण पिढीला केवळ आजच्या राष्ट्राशी नव्हे, तर स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाशी जोडण्याचा यामागील उद्देश आहे.
