
पेहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलली आहेत. भारतातील पाकिस्तानी दूतावास बंद करणं, सर्व पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करणं, सिंधू जल करार समाप्त करणं आणि अटारी चेकपोस्ट बंद करणं असे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे भारतात बेकायदरित्या राहणारी पाकिस्तानी नागरिक सीमा हैदरच्या भविष्याबद्दल प्रश्न निर्माण झालाय. सीमा हैदरला भारताबाहेर काढलं जाणार का? की, कोर्टात जे तिचे खटले सुरु आहेत, ते विचारात घेऊन सवलत दिली जाईल?
22 एप्रिल 2025 रोजी पेहेलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. यात 28 निरपराध भारतीयांचा मृत्यू झाला. सरकारने त्वरित कारवाई करत पाकिस्तानी दूतावास बंद केला. सर्व पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याची घोषणा केली. सोबतच पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना 48 तासात देश सोडण्याचा आदेश दिला.
तिचा विषय अधिक जटिल बनला
सीमा हैदरने मे 2023 मध्ये नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात प्रवेश केला होता. आता सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तिचा विषय सुद्धा चर्चेत आहे. सीमाने ग्रेटर नोएडाच्या रबूपुरा येथे राहणाऱ्या सचिन मीणासोबत लग्न केलं. तिने हिंदू धर्म स्वीकारल्याचा दावा केला आहे. अलीकडेच तिने एका मुलीला जन्म दिला. त्यामुळे तिचा विषय अधिक जटिल बनला आहे. सीमा हैदरकडे भारताची नागरिकता नाहीय. तिचा विषय उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) कक्षेत आहे.
चार मुलांच्या कस्टडीसाठी याचिका
सीमा हैदरचा अवैधरित्या भारतात प्रवेश करण्याचा विषय नोएडा येथील न्यायालयाच्या विचाराधीन आहे. 4 जुलै 2023 रोजी तिला आणि सचिन मीणाला पोलिसांनी अटक केली होती. पण नंतर जामिनावर दोघांची सुटका केली. सीमाने वारंवार म्हटलय की, तिला भारतातच रहायचं आहे. इथेच माझा मृत्यू होईल असं तिने म्हटलय. सीमा हैदरची मागणी मान्य व्हावी, यासाठी तिचे वकील एपी सिंह कोर्टात प्रयत्न करतायत. दुसऱ्याबाजूला सीमा हैदरचा पाकिस्तानी पती गुलाम हैदरने त्यांच्या चार मुलांच्या कस्टडीसाठी भारतीय आणि पाकिस्तानी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.