
मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील २५ विद्यार्थ्यांचे आज रात्री विशेष विमानाने मुंबई विमानतळावर आगमन झाले. महाराष्ट्रात सुखरूप परतल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यावेळी आभार मानले.

मणिपूरमधील इंफाळहून आसाममधील गुवाहाटीपर्यंत आणि तेथून मुंबईपर्यंत विशेष विमानाने या विद्यार्थ्यांना आणण्यात आले. विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुखरूप महाराष्ट्रात आणण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांचे आभार मानले आहेत.

मणिपूरमध्ये शिक्षण घेणारे महाराष्ट्रातील काही विद्यार्थी अडकल्याचे समजताच मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या विद्यार्थ्यांशी रविवारी, दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांची विचारपूस केली होती, त्यांना धीर देऊन तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यात येईल, असे आश्वासित केले होते, त्यानुसार राज्य शासनाने कालपासून विशेष मोहीम राबवून या विद्यार्थ्यांना आज महाराष्ट्रात सुखरूप परत आणले.

मुंबई विमानतळावर आगमन झाल्यानंतर राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडे आणि अब्दुल अजिज बेग आदींनी शासनाच्या वतीने या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.