
टाटा ग्रुपचे संस्थापक जमशेदजी टाटा आहेत. त्यांचा जन्म 1839 मध्ये गुजरातमधील नवसारीत झाला. त्यांनी 1870 मध्ये सुरु केलेल्या उद्योगाचे रुपांतर आता भल्या मोठ्या वटवृक्षात झाले आहे. देशाला औद्योगिक महासत्ता बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

जमशेदजी टाटा यांचे वडील नुसेरवानजी टाटा यांनी व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. जमशेदजी केवळ 14 वर्षांचे असताना वडिलांसोबत मुंबईला आले. त्यांनी शिक्षण घेण्यासाठी मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला.

जमशेदजी यांनी वयाच्या 29 व्या वर्षी व्यवसायाला सुरुवात केली. त्यांनी 21,000 रुपयांच्या भांडवलाने व्यावसायात पदार्पण केले. कापड उद्योगाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी इंग्लंड गाठले. त्याठिकाणी कापड उद्योगाचा अभ्यास त्यांनी केला.

जमशेटजी टाटा यांनी मुंबईत अलेक्झांड्रा मिलची स्थापना केली. 1877 मध्ये नागपुरात एम्प्रेस मिल्स सुरु केली. त्यांनी 1880 च्या दशकापासून ते 1904 मध्ये मृत्यू होईपर्यंत जागतिक दर्जाची शैक्षणिक संस्था उभारल्या. लोखंड आणि पोलाद कंपनी सुरु केली, जलविद्युत निर्मितीसाठी प्रकल्प सुरु केला.
