
मुंबईची राजधानी असलेल्या दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण स्फोटाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना सुरक्षेच्या कारणास्तव हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, शिर्डीचे श्री साई मंदिर आणि मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर यांसह अनेक प्रमुख धार्मिक स्थळांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

सध्या या ठिकाणी भाविकांची कसून तपासणी सुरु आहे. ही चौकशी केल्यानतंरच त्यांना दर्शनासाठी प्रवेश दिला जात आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानी मंदिरामध्ये सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

देशभरातून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यापूर्वी त्यांची पूर्णपणे तपासणी केली जात आहे. भाविकांच्या पर्स आणि बॅगा स्कॅनर मशीनमधून चेक केल्या जात आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारावरच ही कडक तपासणी सुरू आहे.

तर दुसरीकडे दिल्लीतील घटनेनंतर राज्यभरातील धार्मिक तीर्थस्थळे हाय अलर्टवर असून शिर्डी येथील साई मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था अत्यंत सतर्क झाली आहे. शिर्डी श्री साई मंदिरात बॉम्ब शोधक पथक, पोलिस कर्मचारी, एमएसएफ (महाराष्ट्र सुरक्षा बल) जवान आणि मंदिर सुरक्षा विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत.

तसेच मंदिराच्या प्रवेशद्वारावर प्रत्येक भाविकाची कसून तपासणी केली जात आहे. पोलिसांनी परिसरातील ठिकठिकाणी नाकाबंदी केली असून, संशयास्पद वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

त्यासोबतच मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर परिसरात देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मंदिर परिसरात बॅरिकेडिंग करण्यात आले असून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात येत आहे. या स्फोटानंतर मंदिर प्रशासनाची रात्री उशिरा बैठक पार पडली. ज्यात सुरक्षेच्या व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

दरम्यान दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ असलेल्या मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर १ जवळ उभ्या असलेल्या एका गाडीत स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून २४ हून अधिक जण जखमी झाले आहेत.

दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी UAPA (बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, आत्मघातकी हल्ल्याच्या दृष्टिकोनातून तपास सुरू केला आहे.