
‘पारू’ मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणामुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. पारू आणि आदित्य यांचं आयुष्य एका नव्या टप्प्यावर येऊन पोहोचलं आहे. श्रीकांतला हार्ट अटॅक येतो. हे ऐकताच, आदित्य आणि पारू या संकटाच्या काळात हवेलीमध्ये धावत परततात.

त्यावेळेस अहिल्या त्यांना शांततेनं सामोरी जाते. परंतु त्यांच्या नात्याला संमती देत नाही. आदित्य आणि पारू पुन्हा एकत्र होण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, परंतु अहिल्याच्या नाकारामुळे ते दोघंही दुखावले जातात.

अहिल्या थेट पारूला सामोरी जात विचारते, “तुला वाटतं का, तू किर्लोस्कर घराची सून होण्यासाठी योग्य आहेस?” यावर पारू अत्यंत नम्रपणे आणि आत्मविश्वासाने उत्तर देते “नाही… पण मी माझं सर्वस्व देऊन त्यासाठी स्वतःला पात्र बनवेन.”

या क्षणानंतर मालिकेचा प्रवास एका नव्या दिशेने सुरू होताना दिसणार आहे. पारूच्या परिवर्तनाचा, तिच्या समर्पणाचा आणि आत्मसाक्षात्काराचा प्रवास सुरू होणार आहे. जो तिला खर्या अर्थाने किर्लोस्कर घरची सून बनण्याच्या दिशेने नेणार आहे.

'पारू' ही मालिका दररोज संध्याकाळी 7 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. यामध्ये प्रसाद जवादे आणि शरयू सोनावणे यांच्या मुख्य भूमिका आहेत.