Aayush Komkar Murder Case : …म्हणूनच आयुषचा धाडधाड गोळ्या घालून खून, हादरवून टाकणारं कारण समोर, त्या दाव्याने खळबळ!
आयुष कोमकर हत्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. या हत्येमागे टोळी युद्ध असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान या प्रकरणी न्यायालयातील युक्तिवादादरम्यान आरोपीच्या वकिलाने खळबळजनक दावा केला आहे.

आयुष कोमकर हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. टोळी युद्ध आणि सूड भावनेतून आयुषची हत्या करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणात एकूण 13 आरोपी आहेत.

पोलिसांनी 13 आरोपींपैकी 6 आरोपींनी न्यायालयात हजर केलं. या सर्व आरोपींना न्यायायाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान आरोपींना न्यायालयात नेल्यानंतर सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांनी युक्तिवादादरम्यान खळबळजनक दावे केले आहेत.

आरोपी बंडू आंदेकरच्या वकिलांनी आयुषचा खून झाला तेव्हा बंडू आंदेकर महाराष्ट्रात नव्हताच असा दावा केला. तसेच बंडू आंदेकर यांना या प्रकरणात गोवले जात आहे. या प्रकरणाशी बंडू आंदेकर यांचा काहीही संबंध नाही, असाही युक्तिवाद यावेळी बंडू आंदेकर यांचे वकील प्रशांत पवार यांनी केला.

तसेच यावेळी आयुष कोमकर याच्या हत्येच्या संभाव्य कारणाचाही प्रशांत पवार यांनी उल्लेख केला. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणात गणेश कोमकर हा तुरुंगात आहे. आयुष कोमकर हा गणेश कोमकर यांचा मुलगा आहे. वनराज आंदेकर नगरसेवक होता. तो युथ आयकॉन होता. त्यामुळेच अन्य कोणी आयुषचा खून केला असावा, असा दावा प्रशांत पवार यांनी केला.

दरम्यान, आता या प्रकरणात सध्या फरार असलेल्या अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे. सध्या अटकेत असलेल्या आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली असून आता त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. या चौकशीतून इतर स्फोटक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.