
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. शनिवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे काठापूर येथील शेततळे फुटले. यामुळे शेततळ्याचे पाणी शेतात गेले. शेकडो एकर शेतीचे नुकसान झाले आहे. शेतातील मातीही पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे.

खेड तालुक्यातील भामाआसखेड धरण अखेर १०० टक्के भरले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या धरणात ८४ टक्के जलसाठा होता. पावसाने दडी मारल्यामुळे तो वाढत नव्हता. परंतु गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे हे धरण शंभर टक्के भरले आहे.

पुणे विभागातील चासकमान, पानशेत, पवना, भाटघर धरण शंभर टक्के भरले आहे. खडकवासला धरणात ७४.९१ टक्के जलसाठा आहे. वीर धरण ४९.६१ टक्के भरले आहे तर मुळशी धरणात ९८.७५ टक्के जलसाठा झाला आहे.

धरणात जलसाठा वाढल्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांची पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली आहे. यामुळे शेतीला चांगला फायदा होणार आहे. रब्बी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन सोडता येणार आहे. अजून पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणातून विसर्ग वाढणार आहे.

यंदा पावसाला उशिरा सुरुवात झाली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पाऊस नव्हता. यामुळे यंदा पिण्यास तरी पाणी मिळणार का? ही चिंता व्यक्त केली जात होती. त्यावेळी सप्टेंबर महिन्यात पाऊस झाल्यामुळे पिण्याची पाण्याची चिंता मिटली आहे.