
टीम इंडियाने धर्मशालेत इंग्लंड विरुद्ध विजयी चौकार लगावला. टीम इंडियाने यासह 5 सामन्यांची मालिका 4-1 ने जिंकली. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने ही कामगिरी केली. या निमित्ताने आपण टीम इंडियाला कसोटीत सर्वाधिक सामने जिंकून देणाऱ्या कर्णधाराबांबत जाणून घेणार आहोत.

रोहित शर्मा याने आतापर्यंत टीम इंडियाचं 16 कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केलं आहे. या 16 पैकी 10 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवलाय. रोहित टीम इंडियाचा पाचवा यशस्वी कर्णधार आहे.

यशस्वी कर्णधार म्हणून माजी क्रिकेटर मोहम्मद अझहरुद्दीन हे चौथ्या क्रमांकावर आहे. अझहरुद्दीनने टीम इंडियाला 14 सामन्यात विजयी केलंय.

टीम इंडियाला लढायला आणि भिडायला शिकवणारा दादा अर्थात सौरव गांगुली या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. गांगुलीने टीम इंडियाचं 49 सामन्यात नेतृत्व केलं. या 49 पैकी 21 सामन्यात टीम इंडियाचा विजय झालाय.

कॅप्टन कूल अर्थात महेंद्रसिंह धोनी हा टीम इंडियाचा दुसरा यशस्वी कसोटी कर्णधार आहे. धोनीने आपल्या नेतृत्वात 27 सामन्यात विजय मिळवून दिलाय.

तर विराट कोहली हा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. विराटने आपल्या नेतृत्वात भारताला 40 कसोटी सामन्यात विजयी केलं. त्यापैकी 16 सामने परदेशात जिंकले आहेत.