Yashasvi Jaiswal चं विक्रमी अर्धशतक, विराटचा महारेकॉर्ड उध्वस्त
Yashasvi Jaiswal | टीम इंडियाचा युवा आणि आक्रमक फलंदाज यशस्वी जयस्वाल याने तडाखेदार अर्धशतक झळकावलं. यशस्वीने यासह विराटला मागे टाकलं.

टीम इंडियाने इंग्लंडला पाचव्या कसोटीतील पहिल्या डावात 218 धावांवर गुंडाळलं. यामध्ये कुलदीप यादव, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या फिरकी त्रिकुटाने योगदान दिलं. त्यानंतर कॅप्टन रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ही मुंबईकर सलामी जोडी मैदानात आली. रोहित आणि यशस्वी या दोघांनी टीम इंडियाला अफलातून सुरुवात करुन दिली. यशस्वीने इंग्लंड विरुद्धचा धमाका या पाचव्या सामन्यातही कायम ठेवला.

यशस्वीने पाचव्या कसोटीत चौकार ठोकून अर्धशतक पूर्ण केलं. यशस्वीच्या कसोटी कारकीर्दीतील हे 4 चौथं कसोटी शतक ठरलं.

यशस्वीने 56 बॉलमध्ये 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने हे वादळी अर्धशतक पूर्ण केलं. मात्र त्यानंतर यशस्वी 57 धावांवर आऊट झाला. यशस्वीने या अर्धशतकी खेळीसह अनेक कारनामे केले. यशस्वीने विराट कोहली याचा महारेकॉर्ड उध्वस्त केला.

यशस्वी एका द्विपक्षीय कसोटी मालिकेत 700 पेक्षा अधिक धावा करणारा टीम इंडियाचा दुसरा बॅट्समन ठरलाय. यशस्वीच्या नावावर आतापर्यंत इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत 712 धावांची नोंद झाली आहे.

तसेच यशस्वीने विराट कोहली याचा भारतात आणि भारताबाहेर एका मालिकेत सर्वाधिक अनुक्रमे 655 आणि 692 धावांचा रेकॉर्ड ब्रेक केला. विराटने 2014/15 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 692 धावा केल्या होत्या. तर इंग्लंड विरुद्ध भारतात 2016 साली 655 धावा केल्या होत्या.

आता यशस्वीला गावस्कर यांचा एका मालिकेत टीम इंडियासाठी सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी किमान 21 आणि कमाल 63 धावांची गरज आहे.

सुनील गावस्कर यांनी भारतात 1978/79 साली वेस्ट इंडिज विरुद्ध 732 धावा केल्या होत्या. तर 1971 साली विंडिज दौऱ्यात सर्वाधिक 774 धावा केल्या होत्या.