
नंदुरबारमधील नवापूर तालुक्यातील करंजाळी ग्रामपंचायतील वाघेरे वस्तीतील शाळेकरी मुलांना जाण्यासाठी रस्ता नाही. यामुळे मुलांना जीव धोक्यात घालून शिक्षण घेण्यासाठी प्रवास करावा लागत आहे.

करंजाळी ते वाघारे दरम्यान नेसू नदीवरील पूल पूर्ण झाला नाही. या पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

पुलाच्या कामासंदर्भात प्रशासनाला गावकऱ्यांकडून वारंवार सांगण्यात आले. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. लहान मुले आणि विद्यार्थीत जीव धोक्यात घालून नदी ओलांडत असताना लोकप्रतिनिधीसुद्धा आवाज उठवत नाही.

देशात शिक्षण हक्क कायदा लागू करण्यात आला आहे. १४ वर्षांपर्यंत मुलांना हक्काचे मोफत शिक्षण देणे सक्तीचे आहे. परंतु शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी किती दिवस या पद्धतीने संघर्ष करावा लागणार? असा प्रश्न आहे.

नंदुरबार हा आदिवासी जिल्हा आहे. या भागाच्या विकासासाठी शासनाककडून मोठ्या प्रमाणावर निधी दिला जातो. परंतु अजूनही नंदुरबार जिल्ह्यातील अनेक गावांना रस्ते नाही. नद्यांवर पूल नाही. शिक्षणासाठी मोठी पायपीट करावी लागते.