
कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. २१ जून रोजी पहाटे नृसिंहवाडी येथील प्रसिद्ध श्री दत्त मंदिरातही नदीचे पाणी पोहोचले.

दरवर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीस मंदिराच्या परिसरात पाणी येण्याची शक्यता असते. मात्र यंदा जून महिन्यातच मंदिरासमोरील पोर्चमध्ये पाणी आले आहे. धरणांतून विसर्ग वाढल्याने नदीची पाण्याची पातळी वाढली आहे.

गेल्या २४ तासांत कृष्णा-पंचगंगा नदीची पाणी पातळी तीन फूट वाढली आहे. यामुळे नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर परिसरात पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दत्त देवस्थान समितीमार्फत साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

नाशिक परिसरातही जोरदार पाऊस झाला. यामुळे नाशिकच्या गंगापूर आणि दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. गंगापूर धरणातून 2 हजार 320 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणक्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढवला आहे.

गेल्या 15 वर्षानंतर जून महिन्यातच गंगापूर धरण 65 टक्के भरले आहेत. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. दारणा धरणातून 4742 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाण्याचा विसर्ग वाढवल्याने गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.