काश्मीर हा भारत-पाकचा मुद्दा, मग आता एकट्या भारताचा कसा? काँग्रेसचा सवाल, अमित शहांनी धुतलं

| Updated on: Aug 06, 2019 | 12:35 PM

लोकसभेत काश्मीर मुद्द्यावरुन काँग्रेसने एकप्रकारे सेल्फ गोल केला. खासदार अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी जम्मू कश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात प्रलंबित असल्याचं नमूद करताच, काँग्रेसवर सत्ताधाऱ्यांनी आगपाखड केली.

काश्मीर हा भारत-पाकचा मुद्दा, मग आता एकट्या भारताचा कसा? काँग्रेसचा सवाल, अमित शहांनी धुतलं
Follow us on

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये केवळ काश्मीर नव्हे तर पाकव्याप्त काश्मीरचाही समावेश होतो. तो सुद्धा भारताचाच भाग आहे. त्यासाठी जीव द्यावा लागला तरी बेहत्तर, पण पाकव्याप्त काश्मीरही आमचाच, अशी गर्जना गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी लोकसभेत केली. जम्मू काश्मीरमधील 370 कलम रद्द (Jammu Kashmir Article 370) करण्याची घोषणा राज्यसभेत केल्यानंतर, आज अमित शाहांनी लोकसभेत निवेदन दिलं. पण यावेळी काँग्रेसने (Congress) भारत सरकारच्या भूमिकेवरच संशय व्यक्त करत, थेट लोकसभेत प्रश्न उपस्थित केले. मोदी सरकारने नियमांची पायमल्ली करुन, काश्मीरचे तुकडे पाडल्याचा आरोप केला. यानंतर अमित शाहांनी उत्तर देत, कोणते नियम मोडले हे सांगा, अशी विचारणा करत, काँग्रेसवर हल्ला चढवला.

काँग्रेसचा सेल्फ गोल

लोकसभेत काश्मीर मुद्द्यावरुन काँग्रेसने एकप्रकारे सेल्फ गोल केला. खासदार अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी जम्मू कश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात प्रलंबित असल्याचं नमूद करताच, काँग्रेसवर सत्ताधाऱ्यांनी आगपाखड केली.

अमित शाह यांनीही त्याला उत्तर देत, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, त्याबाबत संयुक्त राष्ट्राने ढवळाढवळ करावी असं तुम्हाला का वाटतं, असा सवाल त्यांनी काँग्रेसला केला.  काश्मीरबाबत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार संसदेला आहे, असं शाहांनी नमूद केलं.

त्यावेळी काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी सरकारने नियमांचं उल्लंघन केल्याचं म्हटलं. मग अमित शाहांनी कुठल्या नियमांचं उल्लंघन केलं ते सांगा, अशी विचारणा केली.

याप्रसंगी गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली.संयुक्त राष्ट्राने काश्मीर मुद्द्यात लक्ष घालावं, ही काँग्रेसची भूमिका आहे का हे त्यांनी स्पष्ट करावं, असं अमित शाह म्हणाले.

मोदी सरकारने रातोरात नियम मोडून, जम्मू काश्मीरचे तुकडे केले असा आरोप काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केला. अधीर रंजन चौधरी यांच्या या वक्तव्यावर अमित शाह चांगलेच भडकले. सरकारने कोणता नियम तोडला हे सांगा, आम्ही त्याचं उत्तर देऊ, असं शाह म्हणाले.

त्यानंतर अधीर रंजन चौधरी यांनी काश्मीरचं प्रकरण कधीही अंतर्गत नाही असं म्हटल्याने गदारोळ वाढला. चौधरी म्हणाले, “काश्मीरप्रश्नी संयुक्त राष्ट्र 1948 पासून देखरेख करत आहे”. यानंतर अमित शाहांनी आक्रमक पवित्रा घेत, ही काँग्रेसची भूमिका आहे असं समजायचं का? असं विचारलं.

भारताच्या एका माजी पंतप्रधानांनी जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर शिमला करार आणि दुसऱ्या पंतप्रधानांनी लाहोर यात्रा केली, मग याला अंतर्गत प्रकरण कसं समजायचं, अशीही विचारणा काँग्रेसने केली.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काही दिवसापूर्वीच अमेरिकेला खडसावताना काश्मीर ही द्विपक्षीय बाब आहे असं म्हटलं होतं. तरीही जम्मू काश्मीर भारताचा अंतर्गत मुद्दा कसा, अशीही विचारणा काँग्रेसने केली.