Aditya Thackeray : ‘बंडखोरांनी उद्धव ठाकरेंच्या आजारपणाचा फायदा घेतला, स्वार्थ साधला’, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, लढा जिंकण्याचा निर्धार

| Updated on: Jun 24, 2022 | 11:56 PM

आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांवर जोरदार निशाणा साधला. त्यातबरोबर गुवाहाटीला असलेल्या आमदारांपैकी 50 टक्के आमदार आजही आपल्यासोबत असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केलाय.

Aditya Thackeray : बंडखोरांनी उद्धव ठाकरेंच्या आजारपणाचा फायदा घेतला, स्वार्थ साधला, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, लढा जिंकण्याचा निर्धार
आदित्य ठाकरे
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत भूकंप झालाय. असं असलं तरी राज्यभरातील संघटना मजबूत ठेवण्यासाठी आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून शिवसेना विभागप्रमुख, जिल्हा प्रमुख, नगरसेवकांची बैठक घेतली जातेय. आज आदित्य ठाकरे यांनी राज्यभरातील नगरसेवकांची (Shivsena Corporators) ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत बोलताना आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांवर जोरदार निशाणा साधला. त्यातबरोबर गुवाहाटीला असलेल्या आमदारांपैकी 50 टक्के आमदार आजही आपल्यासोबत असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केलाय.

आदित्य ठाकरे नगरसेवकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, गुवाहाटीला जे आमदार आहेत त्यातील 50 टक्के आमदार आजही आपल्यासोबत आहेत. कारण, त्यातील काहींना जेवणासाठी म्हणून घेऊन गेले आणि मग कैदी करुन नेलं. उद्धव ठाकरे यांनी सात आठ दिवसांपूर्वी ही बंडखोरीची कुणकुण ऐकली होती. तेव्हा त्यांनी सर्वांना बोलावून मुख्यमंत्रीपद सोडण्याचीही तयारी केली होती. आज बंडखोरांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. कारण त्यांना भाजपमध्ये विलीनीकरणाशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.

सूरत किंवा गुवाहाटीत जाऊन काय बंड करता?

हिंमत असती तर महाराष्ट्रात राहून सांगितलं असतं. सूरत किंवा गुवाहाटीत जाऊन काय बंड करता? शिवसैनिक होता तर उद्धव ठाकरे यांच्यासमोर बोलायला हवं होतं. मी यापूर्वीच दोन बंड पाहिली तर पहिलं जे बंड होतं त्या सगळ्यांना पुढच्या निवडणुकीत आपण हरवलं होतं. त्यानंतर 2004 – 2005 मध्ये जे बंड झालं ते मी पाहिलं होतं आणि त्यांना पुढच्या दोन वर्षात आपण संपवलं होतं. अनेकदा अशी बंड होत असतात. अनेक बंड विरोधी पक्षातून सत्तेत जाण्यासाठी असतात पण हे एकमेव असं बंड आहे जे सत्तेतून विरोधात जाण्यासाठी आहे. काळजीचं कारण नाही आपल्यासोबत आकडेही आहेत आणि शिवसैनिकही आहेत. आता प्रत्येक लढाई जिंकण्यासाठी करायची आहे. ती कुणासोबत तर जे आपल्यासोबत राहिले ते आपल्यासोबत आणि जे येणार नाहीत ते विरोधक म्हणूनच आपल्याला लढायचं आहे, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी नगरसेवकांमध्ये नवी उर्जा भरण्याचा प्रयत्न केला.

‘महापालिका, नगरपालिका, पुढची प्रत्येक निवडणूक आपण जिंकू’

आजपासून पुढे जात असताना एक निर्धार आपण करायचा आहे. पुढच्या काही महिन्यात नगरपालिका, महापालिका निवडणुका लागल्या तर लढायचं कसं असा प्रश्न पडेल. पण काही सर्वे पाहिले तर आजही उद्धव ठाकरे यांची प्रतिमा पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे काळजीचं कारण नाही. बंडखोरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजाराचा गैरफायदा घेतला. त्यांनी आपल्या स्वार्थासाठी हे पाऊल उचललं आहे. ज्यांना यायचं त्यांनी यावं, ज्यांना नको ते आम्हालाही नको आहेत. प्राईस टॅग लावलेले लोक आम्हाला नको. प्राईस लेस लोक आपल्याला हवे आहेत. ईडी वगैरेचा वापर होईल. पण शिवसैनिकांना लढा नवा नाही. जिथे जिथे मी जातो तिथे सांगितलं जातं की तुमचं महाविकास आघाडीचं समीकरण देशासाठी महत्वाचं आहे. कारण, असं समीकरण देशभरात निर्माण होणं गरजेचं आहे. सगळे सोबत असाल तर हा लढा आपण जिंकू, महापालिका, नगरपालिका, पुढची प्रत्येक निवडणूक आपण जिंकू, असा निर्धारही आदित्य ठाकरे यांनी यांनी नगरसेवकांच्या बैठकीत केलाय.