चंद्रपुरातील गुन्हेगारीत वाढ झाल्यानं दारुबंदी उठवली!, अजित पवारांकडून मुनगंटीवारांना उत्तर

चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवल्याच्या मुद्द्यावर बोलताना आज सभागृहात अजित पवार म्हणाले की, मुनगंटीवार तुम्ही दारुबंदी केली. पण तिथल्या लोकांच्या मागणीमुळे आणि चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्यानं दारुबंदी उठवण्यात आली.

चंद्रपुरातील गुन्हेगारीत वाढ झाल्यानं दारुबंदी उठवली!, अजित पवारांकडून मुनगंटीवारांना उत्तर
अजित पवार
| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 7:52 PM

मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) तिसऱ्या दिवशी चंद्रपूरमधील (Chandrapur) दारुबंदीचा मुद्दा उपस्थित झाला. विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दारुबंदी महाविकास आघाडी सरकारने दारुबंदी का उठवली याचं नेमकं कारण स्पष्ट केलंय. युती सरकारच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने ही दारुबंदी उठवली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवल्याच्या मुद्द्यावर बोलताना आज सभागृहात अजित पवार म्हणाले की, मुनगंटीवार तुम्ही दारुबंदी केली. पण तिथल्या लोकांच्या मागणीमुळे आणि चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्यानं दारुबंदी उठवण्यात आली. महिलांची आंदोलने, देवतळे समितीच्या शिफारशी व जनआंदोलनाचा रोष यामुळे चंद्रपूर जिल्हा दारूबंदी करण्याचा निर्णय 2015 साली घेण्यात आला. मविआ सत्तेत आल्यावर काँग्रेसचे नेते व राज्याचे मंत्री विजय वडे्डटीवार यांनी जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यासाठी पुढाकार घेतला होता.

निर्णयाचा पुनर्विचार करणारी उच्च न्यायालयात याचिका

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, शेतकरी नेते ॲड. वामनराव चटप यांचा याचिकाकर्त्यांत समावेश आहे. महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या दारू बंदी उठविण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळावी आणि महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेल्या व्यसनमुक्ती धोरण 2011 ची प्रभावी अंमलबजावणी केली जावी, यांसह महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील अनेक बाबी अधोरेखित करत ही याचिका दाखल केली आहे. दारूबंदी उठविण्याचा निर्णय अन्यायकारक असून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल. या जनहित याचिकेच्या माध्यमातून दारूबंदी कायद्याचे व व्यापक जनहिताचे मुद्दे मांडले आहेत.

तळीरामांनी 6 महिन्यात 94 लाखाची दारु रिचवली

महत्वाची बाब म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवल्यानंतर तळीरामांनी अवघ्या सहा महिन्यात तब्बल 94 लाख लीटर दारू पोटात रिचवल्याचं समोर आलंय. चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी हटवल्यानंतर 6 महिन्यात 94 लाख 34 हजार 42 लिटर दारूची विक्री झाली आहे. 86 दारू दुकान, 264 विदेशी दारू दुकान, 8 वाईन शॉप, 32 बियर शॉप आणि 2 क्लबमधून विक्री झालेल्या दारूचा आकडा राज्य उत्पादन शुल्क विभागाने चार दिवसांपूर्वी जाहीर केलाय.

इतर बातम्या :

ओमिक्रॉनचा धोका वाढला, महाराष्ट्रातील निवडणुकाही बारगळणार?; सभागृहातही चर्चा

भांडूपच्या अर्भक मृत्यूप्रकरणाची फौजदारी चौकशी करा, वरळीत कसली रोषणाई करताय?; शेलार संतापले