आघाडी सरकार शेतकऱ्यांचे नाही, तर घोटाळेबाज “धर्मभास्कर वाघांचे” आश्रयदाते : आशिष शेलार

| Updated on: Aug 04, 2021 | 1:43 PM

राज्यातील आघाडी सरकार शेतकऱ्यांचे रक्षणकर्ते नसून अनेक घोटाळेबाज धर्मभास्कर वाघांचे आश्रयदाते आहेत, अशा घणाघाती टीका भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केलीय.

आघाडी सरकार शेतकऱ्यांचे नाही, तर घोटाळेबाज धर्मभास्कर वाघांचे आश्रयदाते : आशिष शेलार
ashish shelar
Follow us on

धुळे : राज्यातील आघाडी सरकार शेतकऱ्यांचे रक्षणकर्ते नसून अनेक घोटाळेबाज धर्मभास्कर वाघांचे आश्रयदाते आहेत, अशा घणाघाती टीका भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केलीय. त्यांनी धुळ्यात पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. ते 3 दिवसांच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज (4 ऑगस्ट) धुळे येथे संघटनात्मक बैठका घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

आशिष शेलार म्हणाले, “धुळे जिल्हा परिषदेतील कोट्यावधींच्या अपहार प्रकरणाचा मुख्य सुत्रधार धर्मभास्कर वाघ याची राज्यातील जनतेला सतत आठवण व्हावी आणि घोटाळ्यांमध्ये धर्मभास्करचे बाप निघावेत असे एक एक घोटाळेबाज चेहरे ठाकरे सरकारच्या काळात उघड होत आहेत. धर्मभास्कर म्हणेल बाप रे बाब! असे चित्र सध्या आहे. पोलीस यंत्रणेचे कधी नव्हे तेवढे खच्चीकरण ठाकरे सरकारच्या काळात झाले. अधिकऱ्यांमध्ये वॉर सुरू आहे. बार, पब, डिस्को, लेडीज बार आणि काळे धंदे राजरोस पणे सुरु आहेत. दलालांमार्फत बदलत्या आणि बदल्यांची दलाली घेणे सुरू आहे. आता चाईल्ड पॉर्नोग्राफी सारखे भयंकर प्रकार उघड होत आहेत.”

“राज्यात तीन कारभारी आणि रोज बदला अधिकारी अशी स्थिती”

“दुसरीकडे सरकारची प्रशासकीय यंत्रणा कोलमडली आहे. अनेक आएएस दर्जाचे वरिष्ठ अधिकारी अनेक दिवस नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत, तर सतत बदल्या करुन अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करण्यात आले आहे. तीन कारभारी आणि रोज बदला अधिकारी अशी स्थिती राज्यात पहायला मिळते आहे,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

“प्रशासनावर कुणाची पकड नाही, अधिकारी मंत्र्यांना जुमानत नाही”

आशिष शेलार म्हणाले, “प्रशासनावर कुणाची पकड नाही. अधिकारी मंत्र्यांना जुमानत नाही. भ्रष्टाचार बोकाळला आहे. बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असल्याचे उघड होते आहेत. बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. एकीकडे राज्यात कोरोना, पाऊस, वादळ अशा आपत्तींनी थैमान घातले आहे, अशावेळी प्रशासनामध्ये यादवी माजली आहे. कुणाचे कोण ऐकत नाही. राज्य शासनाच्या दिशाहीन कारभारामुळे राज्याची दिशा कोणती हे कळत नाही असे चित्र आहे.”

“जनतेच्या कुठल्याही प्रश्नाला न्याय मिळत नाही”

“सत्तेतील 3 पक्ष एकमेकांशी भांडतात. एकमेकांच्या पक्ष प्रमुखांविषयी वक्तव्य येतात. त्यावरून वाद होतात. तिन्ही पक्षांमध्ये बेदली माजलेली आहे. या बेदलीमुळे नेतृत्वाची बेअदबी ते करीत आहेत. शेतकरी, कामगार, श्रमिक, अलुतेदार, बलुतेदार, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण अशा जनतेच्या कुठल्याही प्रश्नाला न्याय मिळत नाही. म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जनतेमध्ये जातो आहोत. जनतेचा आवाज बनतो आहोत. या सरकार विरोधात आम्ही एल्गार करु,” असेही त्यांनी सांगितले.

“विमानतळावर टक्केवारीच आंदोलन”

शिवसेनेने केलेल्या आंदोलनाच्या प्रश्नावर उत्तर देताना आशिष शेलार म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्या पुढाकाराने देण्यात आले. आज जे बोलत आहेत तेव्हा ते पाळण्यात होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला धक्का लावल्यास भाजप विरोध करेल. आमचा त्याला विरोध आहे आणि राहील. मात्र हस्तांतरणाचा ठराव कॅबिनेटमध्ये कुणी मंजूर केला? ठाकरे सरकारनेच ना, मग बाहेर आंदोलन कशाला? ठरावाच्या वेळी नाव, अटी शर्ती याची काळजी का घेतली नाही?”

“…मग राज्य सरकार अदानींच्या विरोधात कारवाई का करित नाहीत?”

“जे नवाब मलिक याबाबत आज बोलत आहेत ते सरकारमध्ये आहेत. मग अदानींच्या विरोधात कारवाई का करित नाहीत? अदानीं कंपनीला विमानतळ हस्तांतरण करणारा जो ठराव ठाकरे सरकारने मंजूर केला तो मग रद्द का करित नाहीत? ते धाडस नवाब मलिक दाखवतील काय? आतून सपोर्ट आणि बाहेरून विरोध असे सध्या सुरू आहे. अदानींचे सरकारमधील कुणाशी संबंध आहेत हे आता महाराष्ट्राला सर्वश्रुत आहेत. त्यामुळे विरोध पण आपणच करायचा आणि समर्थनही द्यायचं अशी शिवसेनेची टक्केवारीसाठी चाललेली आंदोलनं आहेत,” अशी टीका शेलार यांनी केली.

सरकारचे पितळ उघडे पडण्याची भिती वाटतेय का?

राज्यपालांच्या दौऱ्यावर विचारलेल्या प्रश्नांवर आमदार आशिष शेलार म्हणाले की, राज्यपाल महोदय हे कुलपती आहेत. याचा विसर राज्य सरकारला आणि मंत्र्यांना पडला आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थाची जी आमंत्रणे देतात त्यांना राज्यपाल जात आहेत. ते कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन राष्ट्रपतींना वास्तव माहिती देत आहेत त्यात गैर काय?

जनतेच्या विषयावर प्रश्नांवर ते काम करीत आहेत त्यात चुकीचे काय? राज्य सरकारला भीती कशाची वाटतेय? राज्यात ईडी नको, सीबीआय नको, विरोधी पक्षनेत्यांनी दौरे करु नये असे सांगून त्यांचे दौरेही नको, आता राज्यपाल त्यांच्या अधिकारात काम करीत आहेत तेही नको. राज्य सरकारला कशाची भीती वाटतेय? कसले पितळं उघडे पडेल असे वाटतेय का? असा सवालही आशिष शेलार यांनी केला.

हेही वाचा :

‘खावाले काळ, नी भूईले भार म्हणजे ठाकरे सरकार’, नंदुरबार दौऱ्यात आमदार आशिष शेलार यांचा घणाघात

राज्यपालांवर हल्ला चढवणाऱ्या नवाब मलिकांना भाजप नेत्यांचं प्रत्युत्तर, राज्यपाल नियमात राहुनच काम करत असल्याचा दावा

दरवर्षी निसर्गावर खापर आणि काही लोकांच्या घरावर सोन्याचं छप्पर, आशिष शेलारांचा घणाघात

व्हिडीओ पाहा :

Ashish Shelar criticize MVA Government for corruption allegation