संतोष बांगर यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर ठाकरेगटाच्या अयोध्या पोळ यांचा जोरदार पलटवार, म्हणाल्या…

अयोध्या पोळ यांची संतोष बांगर यांच्यावर टीका...

संतोष बांगर यांच्या त्या वक्तव्यावर ठाकरेगटाच्या अयोध्या पोळ यांचा जोरदार पलटवार, म्हणाल्या...
Image Credit source: social media
| Updated on: Dec 21, 2022 | 6:35 PM

मुंबई : खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना शिंदेगटाचे नेते संतोष बांगर (Santosh Bangar) यांची जीभ घसरली. त्यानंतर त्यांच्यावर टीका झाली. त्याला आता ठाकरेगटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी उत्तर दिलंय. संतोष बांगर यांच्या पोकळ धमक्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्र पाहत आहे. माझ्या गाडीला नुसतच टच करून दाखवा हे असं म्हणून शिवसैनिकांना उकसवतात. त्यांचं ढसाढसा रडणं… मातोश्रीबद्दल वाईट बोलणं. शिवसैनिकांच्या कानाखाली मारणार म्हणण योग्य नाही, असं अयोध्या पोळ (Ayodhya Pol) म्हणाल्या आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझा प्रश्न आहे की तुमच्या विरोधात कोणी लिखाण केलं तर तुम्ही त्याला जेलमध्ये टाकतात. मात्र संजय राऊत यांच्या कानाखाली मारण्याची भाषा संतोष बांगर करताय त्यांच्यावर कारवाई करणार का?, असा सवाल आयोध्या यांनी विचारला आहे.

संविधानिक व्यक्तीने दुसऱ्या संविधानिक व्यक्तीवर मान ठेवणे आणि त्यांच्या पदाचा मान करणे हे गरजेचं आहे, असं अयोध्या म्हणाल्या आहेत.

संतोष बांगर यांची भाषण मी लिहून दिलेली आहेत. ते चौथी नापास आहेत, असा घणाघातही अयोध्या यांनी केलाय.

महाराष्ट्रात कायदा आहे की नाही? कायद्याचं उल्लंघन सत्ताधारी पक्ष करत आहे. अडाणी माणसाला संविधान काय माहित असेल. पण सत्ताधारी याबाबत अनभिज्ञ आहेत, अशी टीका अयोध्या पोळ यांनी संतोष बांगर यांच्यावर केली आहे.

संतोष बांगर यांना विधान करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रोत्साहन आहे. त्याचमुळे अशी वक्तव्यही केली जात असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, असं अयोध्या म्हणाल्या आहेत.

Follow Us