Devendra Fadanvis | जे पी नड्डांच्या वक्तव्यानं शिंदे-भाजप सरकार तोंडावर? फडणवीस म्हणतात ‘ते’ वक्तव्य ठाकरेंसाठी….!

| Updated on: Aug 01, 2022 | 3:48 PM

बिहारमधील भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत जे पी नड्डा यांनी देशभरातील प्रादेशिक पक्षांवर हल्लाबोल केला. विविध राज्यांतील प्रादेशिक पक्ष हे घराणेशाहीवर चालतात, असं ते म्हणाले.

Devendra Fadanvis | जे पी नड्डांच्या वक्तव्यानं शिंदे-भाजप सरकार तोंडावर? फडणवीस म्हणतात ते वक्तव्य ठाकरेंसाठी....!
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः आगामी काळात देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपुष्टात येतील. अनेक राज्यात तीच स्थिती आहे. महाराष्ट्रातही शिवसेना संपुष्टात येतेय… भाजपच्या जेपी नड्डांच्या (J P Nadda)  वक्तव्यानं आज देशभरात खळबळ माजलीय. मात्र महाराष्ट्रात नुकतंच महिनाभरापूर्वी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेसोबत युती करून सत्तेत आलेल्या भाजप (BJP) सरकारची यामुळे कोंडी होताना दिसतेय. एकिकडे केंद्रीय नेतृत्वातील नेते म्हणतायत देशातील प्रादेशिक आणि विशेषतः घराणेशाहीचा पुरस्कार करणारे पक्ष भाजपाला संपवायचेत तर दुसरीकडे महाराष्ट्रात शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षासोबत भाजपाला मोट बांधावी लागलीय. आगामी काळात सर्व प्रादेशिक पक्ष संपवून भाजप हा एकमेव पक्ष उरेल, या जे पी नड्डांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना प्रतिक्रिया विचारली, असता त्यांनाही यावर फारशी स्पष्ट प्रतिक्रिया देता आली नाही. नड्डा यांचं ते वक्तव्य ठाकरेंसाठी होतं, असं म्हणून फडणवीसांनी वेळ मारून नेली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

जे पी नड्डांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना संपतेय असं म्हटलेलं आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेबाबत त्यांनी असं वक्तव्य केलेलं नाही. लोकांच्या मनात याबाबत संभ्रम तयार करू नका, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया काय?

जे पी नड्डा यांच्या वक्तव्यावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले, ‘ आज नड्डा म्हणाले पक्ष संपतील. म्हणजे प्रादेशिक अस्मिता संपवून टाकायची. हिंदूत फूट पाडायची आणि स्थानिक अस्मिता चिरडून टाकायची. राजकारणाच्या तुंबड्या भरायच्या हे भाजपचं कारस्थान भेसूरपणे करताना दिसत नाही. आणीबाणीला देशाला अनुशासन पाहिजे त्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला होता. तेव्हा जेव्हा राजकारणाशी संबंध नव्हता, पुल देशपांडे दुर्गा भागवत साहित्यिक विचारवंत यांनी लोकशाहीच्या होमकुंडात उडी मारली होती. लोकशाही जिवंत ठेवली होती. राष्ट्रपतीच्या निवडणुकीवर तुमचं ऐक्य अवलंबून नसतं. आता वेळ गेलेली नाही. त्यामुळे सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. जनतेनेही एकत्र आलं पाहिजे.

जे पी नड्डांचं वक्तव्य काय?

बिहारमधील भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत जे पी नड्डा यांनी देशभरातील प्रादेशिक पक्षांवर हल्लाबोल केला. विविध राज्यांतील प्रादेशिक पक्ष हे घराणेशाहीवर चालतात. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीदेखील असेच पक्ष आहेत. शिवसेना तर आता संपतेय, असं वक्तव्य जे पी नड्डा यांनी केलं. काँग्रेसदेखील आता भाऊ आणि बहिणीचा पक्ष उरलाय, असं जे पी नड्डा म्हणाले. या पक्षांनी प्रादेशिकवादाचा मुद्दा घेऊन घराणेशाही रुजवली. त्यामुळे हा वंशवाद नष्ट करणे हेच भाजपसमोरील मोठे आव्हान असल्याचं जे पी नड्डा म्हणाले.