शिवसेना आमदारांच्या बैठकीमुळे भाजपने ‘वेळ’ बदलली?

| Updated on: Nov 07, 2019 | 8:32 AM

भाजपने राज्यपालांच्या भेटीसाठी मागून घेतलेली वेळ साडेतीन तासांनी पुढे ढकलल्याची माहिती आहे.

शिवसेना आमदारांच्या बैठकीमुळे भाजपने वेळ बदलली?
Follow us on

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात निवासस्थान ‘मातोश्री’वर शिवसेनेच्या सर्व विजयी उमेदवारांची बैठक होणार आहे. सेनेच्या बैठकीमुळे भाजपला आपलं वेळापत्रक बदलावं लागल्याचं बोललं जात आहे. कारण भाजपने राज्यपालांच्या भेटीसाठी (BJP Leaders Meeting Governor) मागून घेतलेली वेळ साडेतीन तासांनी पुढे ढकलल्याची माहिती आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ‘मातोश्री’वर सकाळी साडेअकरा वाजता शिवसेनेच्या आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे सर्व आमदारांचं मत आजमावून पाहणार आहेत. बैठकीमध्ये शिवसेना पुढील राजकीय वाटचाल ठरवणार असल्यामुळे फक्त सेनाच नाही, तर भाजपचे डोळेही या बैठकीकडे लागून राहिले आहेत.

दुसरीकडे, साधारण त्याच वेळी चंद्रकात पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार हे भाजपचे ज्येष्ठ नेते राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होते. भाजप नेत्यांनी सकाळी साडेदहा वाजता राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली होती. मात्र आता ही वेळ बदलून दुपारी दोन वाजताची करण्यात आलेली आहे.

शिवसेना बैठकीत काय निर्णय घेते, कोणती रणनीती ठरवते, त्यानुसार भाजप पावलं टाकणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळेच भाजपने राज्यपालांच्या भेटीची (BJP Leaders Meeting Governor) उशिराची वेळ बदलून घेतल्याचं म्हटलं जातं. या भेटीनंतर सुधीर मुनगंटीवार पत्रकार परिषद घेऊन तपशील सांगणार आहेत.

आमदारांची पंचतारांकित सोय

दरम्यान, बैठकीनंतर शिवसेनेचे सर्व आमदार एकत्रित ट्रायडेंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदारांमध्ये फूट पडू नये यासाठी यासाठी ही पावलं उचलण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेदरम्यान अशाचप्रकारे सर्व आमदारांना मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये एकत्रित ठेवण्यात आलं होते. शिवसेना आमदारांचा कोणत्याही इतर पक्षासोबत संपर्क होऊ नये, यासाठी हीच रणनीती शिवसेनेकडून वापरली जात असल्याचं दिसत आहे.

भाजपला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार रवी राणा यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे 25 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा केला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शिवसेनेने ही पावलं उचल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

निकाल पंधरवडा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता 15 दिवस उलटले. तरीही सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही सुटलेला नाही. लहान भाऊ-मोठा भाऊ म्हणत ज्या भाजप-शिवसेनेने एकत्रितपणे ही निवडणूक लढली, तेच आता 50-50 चा फॉर्म्युला, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपद यावर अडून बसले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे.

महाराष्ट्रात कर्नाटकची पुनरावृत्ती? बैठकीनंतर शिवसेना आमदारांची पंचतारांकित हॉटेलात रवानगी : सूत्र

विधानसभा निवडणुकीत भाजपने 288 पैकी 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. त्यामुळे सत्ता स्थापन्यासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षाचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे.

शिवसेनेला आतापर्यंत 8 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 56 वरुन 64 वर पोहचलं आहे. भाजपला 11 अपक्षांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे त्यांचं संख्याबळ 105 वरुन 116 जागांवर पोहोचलं आहे. भाजप-शिवसेना यांचं एकत्रित संख्याबळ 180 वर जातं. परंतु देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने दुखावलेल्या शिवसेनेच्या पाठीवर काँग्रेस ‘हात’ ठेवला आणि राष्ट्रवादीने ‘वेळ’ साधली, तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

भाजपला पाठिंबा दिलेले आमदार

  1. महेश बालदी – उरण (रायगड)
  2. विनोद अग्रवाल – गोंदिया (गोंदिया)
  3. गीता जैन – मीरा भाईंदर (ठाणे) – (भाजप बंडखोर)
  4. किशोर जोरगेवार – चंद्रपूर (चंद्रपूर)
  5. रवी राणा – बडनेरा (अमरावती)
  6. राजेंद्र राऊत – बार्शी (सोलापूर)
  7. प्रकाश आवाडे – इचलकरंजी (कोल्हापूर) (काँग्रेस बंडखोर)
  8. संजय मामा शिंदे – करमाळा (सोलापूर) (राष्ट्रवादी बंडखोर)
  9. श्यामसुंदर शिंदे – <पक्ष – शेकाप> लोहा (नांदेड) – (भाजप बंडखोर)
  10. रत्नाकर गुट्टे – <पक्ष – रासप> – गंगाखेड (परभणी)
  11. विनय कोरे – <पक्ष – जनसुराज्य पक्ष> – शाहूवाडी (कोल्हापूर)

शिवसेनेला पाठिंबा दिलेले आमदार

  1. आशिष जयस्वाल – रामटेक (नागपूर)
  2. नरेंद्र भोंडेकर – भंडारा (भंडारा)
  3. चंद्रकांत पाटील – मुक्ताईनगर (जळगाव) – (शिवसेना बंडखोर)
  4. मंजुषा गावित – साक्री, धुळे (भाजप बंडखोर)
  5. राजेंद्र पाटील यड्रावकर – शिरोळ, कोल्हापूर (राष्ट्रवादी बंडखोर)
  6. बच्चू कडू – <पक्ष – प्रहार संघटना> – अचलपूर (अमरावती)
  7. राजकुमार पटेल – <पक्ष – प्रहार संघटना> – मेळघाट (अमरावती)
  8. शंकरराव गडाख – <पक्ष – क्रांतिकारी शेतकरी पक्ष> – नेवासा (अहमदनगर)

यांचा पाठिंबा कोणाला?

  1. मनसे – 01
  2. माकप – 01
  3. एमआयएम – 02

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 पक्षीय बलाबल (Maharashtra Vidhansabha Election Partywise Result)

  • भाजप – 105
  • शिवसेना – 56
  • राष्ट्रवादी – 54
  • काँग्रेस – 44
  • बहुजन विकास आघाडी – 03 (महाआघाडी)
  • प्रहार जनशक्ती – 02 (शिवसेनेला पाठिंबा)
  • एमआयएम – 02
  • समाजवादी पक्ष – 02 (महाआघाडी)
  • मनसे – 01
  • माकप – 01
  • जनसुराज्य शक्ती – 01 (भाजपला पाठिंबा)
  • क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01 (शिवसेनेला पाठिंबा)
  • शेकाप – 01 (भाजपला पाठिंबा)
  • रासप – 01 (भाजपला पाठिंबा)
  • स्वाभिमानी – 01 (महाआघाडी)
  • अपक्ष – 13 – (8 अपक्ष भाजपसोबत, 5 अपक्ष शिवसेनेसोबत)
  • एकूण – 288BJP Leaders Meeting Governor