कर्करोगतज्ज्ञ म्हणून लौकिक, संरक्षण राज्यमंत्रीपदाची कारकीर्दही गाजली, कोण आहेत डॉ. सुभाष भामरे?

| Updated on: Sep 03, 2021 | 8:19 AM

MP Subhash Bhamre | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोपवलेली संरक्षण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी डॉ. सुभाष भामरे यांनी चोखपणे पार पडली होती. देशाची बाजू मांडण्यासाठी त्यांनी परदेशातील अनेक महत्त्वाच्या परिषदांना हजेरी लावली होती. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या सामरिक घडामोडी झाल्या होत्या.

कर्करोगतज्ज्ञ म्हणून लौकिक, संरक्षण राज्यमंत्रीपदाची कारकीर्दही गाजली, कोण आहेत डॉ. सुभाष भामरे?
डॉ. सुभाष भामरे, भाजप खासदार
Follow us on

मुंबई: मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे खासदार डॉ. सुभाष भामरे प्रकाशझोतात आले होते. भाजप आणि महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सुभाष भामरे यांचे नाव सुपरिचित असले तरी संरक्षण खात्याचे राज्यमंत्रीपद मिळाल्यामुळे त्यांच्या कर्तृत्त्वावर शिक्कामोर्तब झाले होते. 2014 आणि 2019 अशा सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी धुळे मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

कोण आहेत डॉ. सुभाष भामरे?

धुळ्यातील साक्री येथे 11 सप्टेंबर 1953 रोजी सुभाष भामरे यांचा जन्म झाला. डाव्या चळवळींतील अर्ध्वयू असणारे रामराव भामरे आणि साक्री विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार गोजरताई भामरे हे त्यांचे आई-वडील होत. त्यामुळे सुभाष भामरे यांना बालपणापासून घरातूनच समाजकारण आणि राजकारणाचे बाळकडू मिळाले. दांडगा जनसंपर्क, उच्च विद्याविभूषित, विनम्र, संयमी आणि हसतमुख व्यक्तिमत्व म्हणून सुभाष भामरे यांच्याकडे पाहिले जाते.

राजकारणापलकीडे महाराष्ट्रातील एक विख्यात कर्करोगतज्ज्ञ म्हणूनही डॉ. सुभाष भामरे यांची ओळख आहे. मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेज, टाटा कर्करोग रुग्णालय आणि जे.जे. महाविद्यालयातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते. हंगेरीतील आंतरराष्ट्रीय कर्करोग संमेलनात डॉ. सुभाष भामरे यांनी स्तनाच्या कर्करोगावरील प्रबंध सादर केला होता.

सुभाष भामरे यांचा राजकीय प्रवास?

घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळालेल्या डॉ. सुभाष भामरे यांनी 1995 साली राजकारणात प्रवेश केला. काँग्रेस, शिवसेना आणि शेवटी भाजप असा त्यांचा प्रवास राहिला. 1995 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 2004 मध्ये भामरे यांनी धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत त्यांचा अवघ्या पाच हजार मतांनी पराभव झाला. 2014 साली भाजपने त्यांना धुळे लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवले. या निवडणुकीत सुभाष भामरे यांनी काँग्रेसच्या अमरिश पटेल यांचा तब्बल पावणेपाच लाखांच्या मताधिक्याने पराभव केला. कालांतराने मोदी सरकारमध्ये त्यांची अनपेक्षितपणे संरक्षण राज्यमंत्रीपदी वर्णी लागली. डॉ. भामरे हे संरक्षण खात्याचा कारभार हाताळणारे महाराष्ट्रातील चौथे नेते ठरले. तसेच पहिल्या फटक्यात खासदारकी आणि मंत्रिपद असा अनोखा विक्रमही त्यांच्या नावावर जमा झाला.

संसदेतील उत्कृष्ट वाकपटू

डॉ. सुभाष भामरे हे 11व्या संसदरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले होते. 543 खासदारांमधून सर्वाधिक प्रश्‍न विचारणे आणि विविध विषयांच्या चर्चांमध्ये सहभागी होत उत्कृष्ट कामगिरी दाखवल्याबद्दल खासदार डॉ. भामरे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

संरक्षण राज्यमंत्री म्हणून लक्षवेधी कामगिरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोपवलेली संरक्षण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी डॉ. सुभाष भामरे यांनी चोखपणे पार पडली होती. देशाची बाजू मांडण्यासाठी त्यांनी परदेशातील अनेक महत्त्वाच्या परिषदांना हजेरी लावली होती. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या सामरिक घडामोडी झाल्या होत्या. पाकिस्तानच्या तावडीत सापडलेला भारतीय जवान चंदू चव्हाण याला पुन्हा सुखरुप मायदेशी आणण्याच्या वाटाघाटी आणि पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायूदलाने बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकसंबंधी निर्णयांमध्ये डॉ. सुभाष भामरे यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.