‘तुम्ही काही केलंच नाही तर झोंबतं कशाला?’, चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात शाब्दिक चकमक

| Updated on: Aug 19, 2020 | 7:59 PM

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात सध्या शाब्दिक चकमक सुरु आहे (Chandrakant Patil Slams Hasan Mushrif).

तुम्ही काही केलंच नाही तर झोंबतं कशाला?, चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात शाब्दिक चकमक
Follow us on

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात सध्या शाब्दिक चकमक सुरु आहे (Chandrakant Patil Slams Hasan Mushrif). चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यावरुन राज्य सरकारवर केलेल्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज्यातील मंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यावरुन भ्रष्टाचार केल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी सीआयडी चौकशीची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीवर हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. चंद्रकांत पाटलांची ही मागणी म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’, असा घणाघात हसन मुश्रीफ यांनी केला होता. मुश्रीफांच्या या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिलं आहे (Chandrakant Patil Slams Hasan Mushrif).

“महाराष्ट्रात काही घडलं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही म्हणायचं नसतं. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनादेखील काही म्हणायचं नसतं. मात्र, राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना लगेचच प्रतिक्रिया द्यायची असते. निष्ठा दाखवण्यासाठी केवढी केविलवाणी धडपड”, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

“2014 ते 2019 दरम्यान बदल्यांमध्ये घोटाळे झाले तर तुम्ही काय झोपा काढत होता? इतक्या उशिरा जाग आल्यामुळे चौकशी करायची तर करा, पण आधी 2020 च्या बदल्यांची चौकशी करा. तुम्ही काही केलं नाही तर झोंबतं कशाला? ग्रामपंचायतींना प्रशासक, पीएम केअर, सुशांत प्रकरण सगळ्या विषयांमध्ये कोर्टाकडून थपडा खायचे असतील तर कोण काय करणार?”, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

“सध्या कोल्हापूरात प्रशासन हतबल आहे. कोरोना साहित्य खरेदीत भ्रष्टाचार, रुग्णांना बेड मिळत नाही, स्वॅबच्या रिपोर्टमध्ये गोंधळ, असा हाहा:कार माजल्याच्या बातम्या रोज प्रसारमाध्यमांतून येत असताना त्याबाबत हसन मुश्रीफ काहीही बोलत नाहीत”, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

हेही वाचा : रिक्षाप्रमाणे तीन‌ चाकी सरकार चालणंही अवघड, सुजय विखे पाटलांचा महाविकास आघाडीला टोला