‘आता संजय राऊतांनी राजकारण सोडावं’, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला

| Updated on: Sep 21, 2021 | 11:07 PM

भाजप नेत्यांनी अनंत गितेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर चांगलंच तोडसुख घेतल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर संजय राऊतांनी आता राजकारण सोडावं असं म्हटलंय.

आता संजय राऊतांनी राजकारण सोडावं, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला
संजय राऊत, चंद्रकांत पाटील
Follow us on

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत गिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी अनंत गितेवर टीका केलीय. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार हे देशाचे नेते असल्याचं म्हणत या विषयावर अधिक बोलणं टाळण्याचं दिसत आहे. मात्र, भाजप नेत्यांनी अनंत गितेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर चांगलंच तोडसुख घेतल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर संजय राऊतांनी आता राजकारण सोडावं असं म्हटलंय. (Chandrakant Patil’s challenge to Sanjay Raut after Anant Gite’s criticism of Sharad Pawar)

‘राऊतांनी आता राजकारण सोडावं’

‘मला तर सुरुवातीला आनंद हा झाला. संजय राऊत वारंवार सांगत होते की शरद पवार यांनी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं उदाहरण मिळाल्यास मी राजकारण सोडेन. आता त्यांना सोडावचं लागेल. त्यांच्या या वक्तव्यानंतर लगेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एक क्लिप समोर आली होती. त्यात तर त्यांनी माझ्यापेक्षा जास्त टीका केली होती. आता अनंतर गिते यांनीही तेच सांगितलं आहे. त्यामुळे मला आनंद आहे की मला जे जाणवतं ते समाजातील अनेकांना जाणवत आहे. कुणी बोलण्याचं धाडस दाखवतो तर कुणी बोलत नाही. अनंत गिते यांनी धाडस दाखवून बोलले. शिस्तबद्ध शिवसेनेतील अनेकांची भावना हीच आहे. पण ते बोलत नाहीत’, अशी खोचक टीका पाटील यांनी केलीय.

नेमकं प्रकरण काय?

चंद्रकांत पाटील यांनी एका भाषणात ‘पाठीत खंजिर खुपसणारं एकच नाव महाराष्ट्राच्या राजकारणात होतं. पण आता पाठीत खंजीर खुपसणारा दुसरा चेहरा समोर येतो’, असं वक्तव्य केलं होतं. पाटील यांचा रोख थेट शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे होता. त्यावरुन शरद पवार यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचं एक उदाहरण दाखवा. मी राजकारण सोडतो, असं ओपन चॅलेंज शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिलं होतं.

5 सप्टेंबर रोजी संजय राऊत आज शिरुर-हवेली इथे आले होते. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना राऊत यांनी थेट चंद्रकांत पाटील यांना ललकारलं होतं. चंद्रकांतदादा हरिश्चंद्राचे अवतार आहेत. आम्ही एकत्र काम केलंय. मी तर नेहमी आव्हान देतो शरद पवारांनी खंजीर खूपसल्याचं एक उदाहरण दाखवा. मी राजकारण सोडतो, असं सांगतानाच ही मराठ्यांची औलाद आहे. आम्ही समोरून वार करतो, असा टोला राऊत यांनी लगावला होता.

अनंत गिते यांचा पवारांवर हल्लाबोल

शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे, असा हल्लाबोल अनंत गिते यांनी रायगडमध्ये बोलताना केलाय. श्रीवर्धन तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पक्ष प्रवेश सोहळा होता. यावेळी अनंत गीते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांशी जाहीर बोलताना, त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत भाष्य केलं. अनंत गिते यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांनी आता राजकारण सोडावं, असा खोचक टोला हाणलाय.

इतर बातम्या :

‘राज्यपालांनी विरोधकांचं थोबाड फोडलं पाहिजे, पण ते उत्तेजन देतात’, संजय राऊतांचा घणाघात

मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, अमित शाहांसोबतही बैठक, नेमकं कारण काय?

Chandrakant Patil’s challenge to Sanjay Raut after Anant Gite’s criticism of Sharad Pawar