Chandrashekhar Bawankule |आजपासून 16 लोकसभा मतदारसंघात जाणार, OBCआरक्षणावरून संभ्रम दूर करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य

| Updated on: Jul 27, 2022 | 1:26 PM

महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे आणि अजित पवारांमुळेच आरक्षण रोखले गेल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला

Chandrashekhar Bawankule |आजपासून 16 लोकसभा मतदारसंघात जाणार, OBCआरक्षणावरून संभ्रम दूर करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आजपासून 16 मतदार संघांचा दौरा सुरु केला आहे. पुणे, सातारा, रत्नागिरी, हातकणंगले, कोल्हापूर, बुलडाणा, सिंधुदुर्ग अशा मतदारसंघांचा प्रवास ते करणार आहेत. भाजपने ओबीसी आरक्षण मिळवून दिले, मात्र राज्यात यावरून अनेकजण संभ्रमित करणारी वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे राज्यभरात आपण दौरा करणार असल्याचं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत केलं. या प्रसंगी  त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडवणीस यांच्या सरकारमुळेच महाराष्ट्राला ओबीसी आरक्षण (OBC reservation) मिळाल्याचा आवर्जून उल्लेख केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांमुळे ओबीसींना आरक्षण मिळू शकलं नाही. ओबीसींचा डेटा तयार करणाऱ्या आयोगालाच महाविकास आघाडीने निधी दिला नाही. त्यामुळे आरक्षणात अडथळे येत होते. मात्र आमचं सरकार येताच ओबीसी आरक्षण मिळवून देऊन, अशी प्रतिज्ञा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा शब्द खरा करून दाखवला, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.

‘ओबीसींचे नेते समाजात भ्रम तयार करतायत’

महाविकास आघाडीचे नेते ओबीसी समाजात कन्फ्युजन करत आहेत, आम्हीच ओबीसी नेते आहेत, असं दाखवण्याचा काहीजण प्रयत्न करत असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मात्र सत्तेत असताना या नेत्यांनी काहीच केलेलं नाही, असंही ते म्हणाले. ओबीसी आरक्षणाच्या लढाईत कसे अडथळे आणले गेले, यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘ 2016 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 27 टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देण्यात आले होते. नाना पटोले यांच्यासोबत असणाऱ्यांनीच ही याचिका दिली होती. 27 टक्के ओबीसी आरक्षण योग्य नाही, असं ते म्हणत होते. देवेंद्र फडणवीसांनी उच्चस्तरीय वकील लावून ओबीसी आरक्षण टिकवण्याचं काम केलं. मात्र महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर यात गडबड सुरु झाली, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

‘उद्धव ठाकरे -अजित पवारांमुळेच आरक्षण रोखले’

महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे आणि अजित पवारांमुळेच आरक्षण रोखले गेल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते म्हणाले, मविआ सरकार असताना मी भुजबळ, नाना पटोले यांना भेटलो. फडणवीसांनी काढलेला अध्यदेश लॅप्स होऊ देऊ नका, म्हणालो. पण त्यांनी दुर्लक्ष केलं. अध्यादेश लॅप्स झाला. त्यानंतर ट्रिपल टेस्ट घेऊन ओबीसी आरक्षण देण्याचे, सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले. मराठा आरक्षणाचा डेटा फडणवीस असताना महिनाभरात तयार झाला होता. आताही त्यांनी महिनाभरात काम केलं. पण भुजबळ, वडेट्टीवार ढोंग करत राहिले. मोर्चे काढत राहिले. यातला एकही दावा खोटा निघाला तर मी शिक्षा घ्यायला तयार आहे, असंही बावनकुळे म्हणाले. त्याच वेळी उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्गुड आयोगाला 435 कोटी रुपये दिले नाहीत. त्यामुळे आरक्षण रखडलं. हे दोघेच झारीतील शुक्राचार्य असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.