उत्कृष्ट संसदपटूचा दर्जा खालावला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

| Updated on: Jul 06, 2021 | 5:40 PM

अध्यक्षांच्या दालनात भास्कर जाधव यांना मारहाण आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यावरुन भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन करण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.

उत्कृष्ट संसदपटूचा दर्जा खालावला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : विधिमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाचा समारोप आज झाला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांवर जोरदार हल्ला चढवलाय. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत अध्यक्षांसमोरील हौदात भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. तसंच अध्यक्षांच्या दालनात भास्कर जाधव यांना मारहाण आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यावरुन भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन करण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. (CM Uddhav Thackeray criticizes Leader of Opposition Devendra Fadnavis)

विधानसभेत झालेल्या राड्यामुळे विधिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेले बाळासाहेब थोरातही अवाक झाले आहेत, मी तर अगदीच नवखा आहे. कालचा संपूर्ण प्रकार पाहून उत्कृष्ट संसदपटूचा दर्जा खालावला असल्याचं पाहायला मिळतयं, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोला लगावलाय. सोमवारी विधानसभेत जे काही झालं ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजिरवाणं आहे. कालचं चित्र मान शरमेनं खाली घालणारं होतं. वेडं वाकडं वागायचं, आरडाओरड करायचा ही लोकशाही नाही. माईक असतानाही बेंबीच्या देठापासून ओरडाचं हे चूक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

विधिमंडळातील सर्व सदस्यांचे आभार

भास्कर जाधव यांच्यासोबत झालेलं वर्तन निंदनीय आहे. राज्यात असा पायंडा पडता कामा नये. असा पायंडा पडायचा नसेल तर सर्वांनी मिळून ठरवायला हवं. मात्र, दोन दिवसांत राज्याच्या हिताचं एवढं काम करणारं हे राज्यातील पहिलं सरकार आहे. या दोन दिवसांत जनतेला समाधान मिळेल असं काम सरकारनं केलंय. त्याबाबत आम्ही विधिमंडळातील सर्व सदस्यांचे आभार मानतो, तर ज्यांच्याकडून जे घडू नये ते घडलं त्यांना सुधारण्यासाठी मी शुभेच्छा देतो, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावलाय.

फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीवर मुख्यमंत्र्यांचा सवाल

उद्धव ठाकरे म्हणाले, “2011 ची सामाजिक आर्थिक सर्वेक्षणाची आकडेवारी केंद्र सरकारकडे आहे. ती आम्हाला मिळावी अशी मागणी होती. त्याच मागणीसाठी अधिकृत ठराव विधानसभा अधिवेशनात आणला होता. त्यात चुकीचं काय आहे? यात इतक्या मिरच्या झोंबण्यासारखं काय आहे? केंद्राच्या सर्वेत 8 लाख चुका असल्याचा दावा करता मग ही माहिती पंतप्रधानांच्या योजनेसाठी कशी वापरता? मग या योजनेत घोटाळा आहे असं म्हणायचं का? ही माहिती ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी देत नाहीत. ही माहिती मागितली की आग लागल्यासारखा थयथयाट करता. 8 लाख चुका असल्याचं म्हणता आणि हीच माहिती पंतप्रधानांच्या योजनेसाठी वापरता. मग हा घोटाळा आहे का? ”

“पंतप्रधानांच्या योजनेसाठी चुकीची माहिती कशी वापरता? हे सगळं गौडबंगाल आहे. नेमका आमच्याकडून असा कोणता अपराध घडला? आम्ही ओबीसींना न्याय देण्यासाठी केंद्र सरकारडे माहिती देण्याची मागणी केली. यात काय गुन्हा केला? भाजप सत्तेत असताना त्यांनीही ही माहिती मागितली होती. मग जर त्या माहितीत 8 लाख चुका होत्या तर तुम्ही ती कशासाठी मागितली होती? ती माहिती निरुपयोगी असेल तर त्यांनी सांगायला हवं होतं की तुमच्या समाधानासाठी आमचा पाठिंबा आहे. काय झालं असतं?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

संबंधित बातम्या :

ठाकरे सरकारचा अहंकार दुर्योधनाच्या अहंकारासारखाच; फडणवीसांचा घणाघाती हल्ला

आरोग्य विभागातही नैराश्याचं वातावरण, शेकडो मानसेवी डॉक्टरांची मुख्यमंत्र्यांकडे मागितली आत्महत्येसाठी परवानगी!

CM Uddhav Thackeray criticizes Leader of Opposition Devendra Fadnavis