AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपालांनी 12 रोखले, भास्कर जाधवांनी 12 ‘बाद’ केले, भाजपानं आयती संधी दिली? वाचा सविस्तर

सभागृहात आणि सभागृहाबाहेर जे काही घडलं त्याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली. राज्यपालांनी आघाडीच्या बारा आमदारांच्या नियुक्त्या रोखल्या. त्याचा बदला म्हणून भास्कर जाधवांनी भाजपच्या बारा विकेट एकाच चेंडूत घेतल्या अशी चर्चा रंगली.

राज्यपालांनी 12 रोखले, भास्कर जाधवांनी 12 'बाद' केले, भाजपानं आयती संधी दिली? वाचा सविस्तर
भास्कर जाधव
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 06, 2021 | 3:23 AM
Share

अधिवेशनाचा पहिला दिवस नि:संशय शिवसेनेचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या नावावर राहिला. कारण त्यांनी जे केलं किंवा काही कारणानं जे काही सभागृहात घडलं, त्यामुळे भाजपचे 12 आमदार (BJP’s 12 MLAS dismissed for year) वर्षभरासाठी तरी बाद झाले. बरं विशेष म्हणजे तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांच्यासारखा जहाल नेता खुर्चीत आहे याचं भान न ठेवता भाजपच्या आमदारांनी गोंधळ घातला आणि त्याचाच फायदा आघाडी सरकारनं घेतला. यात भूमिका वठवली ती भास्कर जाधवांनी. ह्या सगळ्या प्रकरणात भाजपा हिटविकेट झाल्याची चर्चा आहे.

नेमकं काय घडलं त्याक्षणी? शिवसेना नेते भास्कर जाधव हे तालिका अध्यक्ष म्हणून विराजमान झाले आणि ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा चर्चेला आला. मोदी सरकारनं म्हणजेच केंद्रानं ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेला डाटा केंद्रानं द्यावा अशी मागणी करणारा ठराव मांडण्यासाठी भूजबळ उठले. त्याला विरोधी पक्षातल्या नेत्यांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली. त्याचं म्हणनं होतं की, या ठरावाची नोटीस नाही, हे असं करणं नियमात बसत नाही, फडणवीस विविध कामकाज नियमांचा हवाला देत आक्रमक झाले. भास्कर जाधवांनी फडणवीस कसे चुकले हे सांगण्याचा प्रयत्न केला. फडणवीस जे काही मुद्दे मांडतायत त्याकडे दुर्लक्ष करुन जाधव भूजबळांना ठराव मांडायला सांगत होते. त्यावर विरोधी पक्ष आक्रमक होत होता. शेवटी त्याच गोंधळात भास्कर जाधवांनी तो ठराव मांडून घेतला, मताला टाकला. इकडे विरोधी पक्षाचा गदारोळ सुरु झाला. आम्हाला आमेच मुद्दे मांडू द्या म्हणून फडणवीस आक्रमक झाले. भास्कर जाधवांनी त्याच स्थिती मताला टाकलेला प्रस्ताव मंजूर झाल्याचं जाहीर केलं. आता मात्र भाजप आमदार जास्तच आक्रमक झाले. गोंधळाची ठिणगी पडली ती इथेच. भाजपाचे आमदार संजय कुटे, गिरीश महाजन हे अध्यक्षाच्या थेट व्यासपीठावर गेले. संजय कुटे तेवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी भास्कर जाधवांच्या समोरचा माईक खेचला. त्यावर जाधवांनी त्यांना इशारा केला. नंतर कुटेंनी तो माईक सोडला पण तोपर्यंत जो गोंधळ, वाद, गदारोळ व्हायचा तो होऊन गेला. सभागृह तहकूब करण्यात आलं. तेही 15 मिनिटांसाठी.

झिरवळांच्या कॅबिनमध्ये काय घडलं? सभागृहातल्या गोंधळानंतर उपाध्यक्ष झिरवळ यांच्या कॅबिनमध्येही मोठा गोंधळ झाला. तिथं प्रत्यक्ष काय घडलं याचं फुटेज कुणाकडेच नाही. पण दारात भाजपच्या आमदारांनी केलेली गर्दी स्पष्टपणे दृश्यांमध्ये दिसते. पंधरा मिनिटं संपल्यानंतर पुन्हा भास्कर जाधव सभागृहात आले आणि झिरवळांच्या कॅबिनमध्ये त्यांना आई बहिणीवर भाजपच्या आमदारांनी शिविगाळ केल्याचा आरोप केला. हा आरोप खूप गंभीर होता. पण जाधवांनी तो सभागृहात इतका डिटेल सांगितला की विरोधी पक्ष गोत्यात आला. भास्कर जाधवांनी काय घडलं हे सांगितल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजपच्या बारा आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला. तो मंजूरही झाला. दुसरीकडे भास्कर जाधव यांनीच शिवीगाळ केल्याचा आरोप भाजपच्या निलंबित आमदारांनी केला. माझ्यावर झालेला शिवीगाळीचा आरोप सिद्ध केलात तर तुमच्याएवढाच काळ निलंबीत व्हायला तयार असल्याचं जाधवांनी जाहीर केलं. म्हणजेच भाजपनं केलेल्या प्रत्येक गोष्टीवर भास्कर जाधवांनी कुरघोडी केली. कामकाजाच्या सुरुवातीपासूनच आक्रमक भास्कर जाधव हे कोकणातले आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी शिवसेना सोडली होती त्यावेळेस सेना नेतृत्वावर ते तुटून पडले होते. नंतर ते राष्ट्रवादीत गेले. तिथं प्रदेशाध्यक्षही झाले पण पुन्हा ते निवडणुकीआधी शिवसेनेत दाखल झाले. ते सभागृहात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी आक्रमक असतात. विशेष म्हणजे फडणवीसांएवढच ते नियमावर बोट ठेवून बोलण्याचा प्रयत्न करतात. अर्थात त्यामुळेच ते तालिका अध्यक्षही होतात. आज कामकाजाला सुरुवात झाली त्यावेळेस फडणवीसांनी एमपीएससीच्या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी केली. त्याच मुद्यावर भास्कर जाधव आणि फडणवीस यांची शाब्दिक चकमक घडू लागली. फडणवीस बोलत असतानाच जाधव मधातच कमेंट करु लागले. एक वेळ तर अशी आली की, फडणवीस उपाध्यक्ष झिरवळांना म्हणाले की, भास्करराव हे माझे मित्र आहेत. त्यांना तालिका सभापती म्हणून घ्यावे किंवा मंत्री करावे. म्हणजे ते शांत बसतील’ फडणवीसांच्या चिमट्यानंतरही भास्कर जाधव शांत झाले नाहीत. त्यांच्या अधूनमधून कमेंट सुरुच होत्या. नंतर मुनगंटीवार बोलायला लागले. त्यातही भास्कर जाधव कॉमेंट करु लागले. मुनगंटीवारांनी मग अनिल देशमुखांचा संदर्भ घेत थेट भास्कर जाधवांना धमकीच दिली. ती खरं भास्कर जाधवांना संधी दिल्यासारखंच झालं. त्यावर सत्ताधारी पक्षही आक्रमक झाला आणि भास्कर जाधवही. जाधवांच्या मदतीला नाना पटोलेही आले. शेवटी झिरवळांनी हस्तक्षेप केला.

सभागृहात आणि सभागृहाबाहेर जे काही घडलं त्याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली. राज्यपालांनी आघाडीच्या बारा आमदारांच्या नियुक्त्या रोखल्या. त्याचा बदला म्हणून भास्कर जाधवांनी भाजपच्या बारा विकेट एकाच चेंडूत घेतल्या अशी चर्चा रंगली. काहींना तर क्रिकेटपटू अनिल कुंबळेनं घेतलेल्या बारा विकेटचीही आठवण झाली. भास्कर जाधव म्हणजे आघाडीचे फिरकीपटू कुंबळे असल्याचं म्हणाले. काहीही असो. भाजपा आघाडीच्या ट्रॅपमध्ये अडकली अशीच चर्चा जोरदार रंगलीय.

Follow Us
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत.
मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप
मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप.
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार....
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार.....
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी.
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.