India 80 Independence Day : मुलगा लश्कर ए तयबाचा खतरनाक दहशतवादी पण काश्मीरमध्ये आई-वडिलांनी घरावर फडकवला तिरंगा
India 80 Independence Day : जम्मू-काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याच्या आई-वडिलांची कृती चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांचा मुलगा दहशतवादी आहे. भारतविरोधी कारवाया करत असतो. पण आई-वडिलांनी आज 80 व्या स्वातंत्र्यदिनी आपल्या कृतीतून चांगला संदेश दिला.

आज भारताला स्वतंत्र होऊन 80 वर्ष पूर्ण झाली. काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत लोक तिरंगा फडकवून या क्षणाचा आनंद साजरा करत आहेत. या प्रसंगी काश्मीरमधून संपूर्ण भारतभर एक चांगला संदेश जाईल अशी घटना घडली आहे. गेली कित्येक वर्ष काश्मीर दहशतवादामध्ये होरपळतय. मागच्या दोन-तीन वर्षांपासून इथे दहशतवाद मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. मात्र, आजही काही तरुण तिथे दहशतवादाचा मार्ग स्वीकारतात हे वास्तव आहे. शोपियांमध्ये एका दहशतवाद्याच्या आई-वडिलांनी घरावर तिरंगा फडकवून आपल्याला भारतच प्रिय असल्याचा संदेश दिला आहे. लश्कर ए तयबाचा कमांडर आबिद रमजान शेखच्या आई-वडिलांनी घरावर तिरंगा फडकवला. त्यांच्या या कृतीच सर्वत्र कौतुक आणि स्वागत होत आहे.
आबिद रमजान शेख हा काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया करत असतो. काश्मीर खोऱ्यातील अनेक दहशतवादी घटनांमध्ये त्याचा सहभाग आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार आबिद अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याने त्याचं नाव मोस्ट वाँटेड दहशतवाद्याच्या यादीत आहे. आबिद लश्कर ए तयबाच्या उद्देशानुसार दुसऱ्या राज्यातील नागरिकांना लक्ष्य करण्याचं काम करतो. अशावेळी शेखच्या आई-वडिलांची घरावर तिरंगा फडकवण्याची कृती सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
बुरहान वानीला दहशतवाद्यांनी पोस्टर बॉय बनवून ठेवलेलं
एका दहशतवाद्याच्या घरावर तिरंगा फडकवण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी सुरक्षा पथकांच्या कारवाईत मारला गेलेला हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वानीच्या वडिलांनी सुद्धा 2021 साली घरावर तिरंगा फडकवला होता. बुरहान वानीला दहशतवाद्यांनी पोस्टर बॉय बनवून ठेवलेलं. पण सरकारी कर्मचारी असलेल्या त्याच्या वडिलांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवला व एका कार्यक्रमात सहभागी झाले.
उमर अब्दुल्ला आपल्या भाषणात काय म्हणाले?
या दरम्यान सगळ्या जम्मू-काश्मीरमध्ये स्वतंत्रता दिवस पूर्ण उत्साहाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी आपल्या भाषणात जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला म्हणाले की, “जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी आणि अन्य संवैधानिक गॅरेंटी मिळवून देण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे”
