‘शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देऊ, आमचं सरकार त्यांच्यासारखं नाही’, फडणवीसांचा अजितदादांना टोला

शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली जाईल. त्यांच्या सरकारसारखं आमचं सरकार नाही. दुष्काळ असो, ओला दुष्काळ असतो, अतिवृष्टी असो, त्यांच्या सरकारमध्ये सात सात महिने कधीच मदत मिळाली नाही, असा टोला फडणवीसांनी लगावलाय.

शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देऊ, आमचं सरकार त्यांच्यासारखं नाही, फडणवीसांचा अजितदादांना टोला
देवेंद्र फडणवीस, अजित पवार
Image Credit source: TV9
| Updated on: Jul 28, 2022 | 6:15 PM

मुंबई : एकट्या गडचिरोली जिल्हयात 25 हजार हेक्टर क्षेत्रावर शेतीचे नुकसान (Crop Loss) झालं आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाऊणलाख रुपयांची मदत करावी आणि ज्या 12 लोकांनी जीव गमावला आहे त्यांच्या कुटुंबीयांना भरीव मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलीय. तसंच शेतकरी संकटात असताना मंत्रिमंडळ विस्ताराला होणाऱ्या विलंबावरुनही अजितदादांनी शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. अजित पवार यांच्या टीकेला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिलंय. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली जाईल. त्यांच्या सरकारसारखं आमचं सरकार नाही. दुष्काळ असो, ओला दुष्काळ असतो, अतिवृष्टी असो, त्यांच्या सरकारमध्ये सात सात महिने कधीच मदत मिळाली नाही, असा टोला फडणवीसांनी लगावलाय.

‘केंद्राची वाट न पाहता राज्याच्या तिजोरीतून शेतकऱ्यांना मदत करु’

शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली जाईल. त्यांच्या सरकारसारखं आमचं सरकार नाही. दुष्काळ असो, ओला दुष्काळ असतो, अतिवृष्टी असो, त्यांच्या सरकारमध्ये सात सात महिने कधीच मदत मिळाली नाही. आमचं सरकार तत्काळ मदत करेल. कालच मुख्यमंत्र्यांनी आणि मी आढावा घेतला. 50 टक्के पंचनामे पूर्ण झाले होते आणि रोज 10 टक्के त्यात वाढ होतेय. त्यामुळे आठवडाभरात 100 टक्के पंचनामे पूर्ण होतील. मग आम्ही शेतकऱ्यांना मदत घोषित करु आणि तत्काळ ती मदत पोहोचेल याची काळजी घेऊ. आम्ही केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्याच्या तिजोरीतून शेतकऱ्यांना मदत करु, अशी घोषणाच फडणवीस यांनी केलीय.

एकनाथ शिंदेंचंही अजित पवारांना उत्तर

मंत्रिमंडळ विस्तार तर होईलच. पण मी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी या राज्याचा कारभार हाती घेतल्यानंतर आपण पाहताय की शेतकऱ्यांसाठी आम्ही मोठे निर्णय घेतली. पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला, दुष्काळग्रस्त भागात पाणी वळवण्याचा निर्णय घेतला. कालच्या कॅबिनेटमध्ये आम्ही अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. अनेक प्रकल्प जे राज्याच्या हिताचे आहेत ते पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान त्याचे युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार आहे. सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. राज्याचं काम आम्ही थांबू दिलं नाही, असा दावा करत शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलंय.