Eknath Shinde: पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडा, एकनाथ शिंदेंच्या उद्धव ठाकरेंकडे 4 मागण्या

एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महत्वाचं आवाहन केलं आहे. शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून चार मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यात पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडा असं आवाहन त्यांनी केलंय.

Eknath Shinde: पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडा, एकनाथ शिंदेंच्या उद्धव ठाकरेंकडे 4 मागण्या
sagar joshi | Updated on: Jun 22, 2022 | 8:36 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना भावनिक साद घातलीय. त्यानंतर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महत्वाचं आवाहन केलं आहे. शिंदे यांनी ट्विटरच्या (Twitter) माध्यमातून चार मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यात पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडा असं आवाहन त्यांनी केलंय. तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे मी राजीनामा द्यायला तयार आहे, फक्त माझ्यासमोर येऊन एकदा बोला, मी शिवसेना पक्षप्रमुख पदही सोडेल, पण मला शिवसैनिकांनी समोर येऊन सांगावं, असं भावनिक आवाहन केलं होतं. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केलीय.

एकनाथ शिंदेंच्या नेमक्या मागण्या कोणत्या?

  1. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला.
  2. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे.
  3. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.
  4. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.

उद्धव ठाकरेंचं भावनिक आवाहन काय?

उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यात त्यांनी  मी नेमकं काय बोलणार? मला दुख कशाचं झालं? आश्चर्य कशाचं वाटलं? दुखं कशाचं वाटलं? काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हवे. दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत, त्यांचा विचार आहे. सत्तेसाठी आपण एकत्रं आलो. आज सकाळी कमलनाथ यांनी फोन केला. काल पवारांनी फोन केला. आम्ही तुमच्यासोबत आहे असं सांगितलं, त्यांनी भरवसा ठेवला. पण माझीच लोकं म्हणत आहेत की मी मुख्यमंत्री नको. ते मला माझं मानतात की नाही माहीत नाही. तुम्ही इथं येऊन का बोलले नाही? माझ्यासमोर बोलायला हवं होतं. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नालायक आहात, तुम्ही नकोत, असं त्यांनी बोलायला हवं होतं. मला एकाही आमदाराने सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्रीपदी नको तर मी मुख्यमंत्रीपद घेणार नाही. आजच मी वर्षावरून मातोश्रीवर मुक्काम हलवतो. मला सत्तेचा मोह नाही. तुम्ही हे कशाला करत आहात? त्यामुळे कुणाचं नुकसान करायचं आहे? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केलाय.

महाविकास आघाडीबाबत काय म्हणाले ठाकरे?

उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबाबत आपली भूमिका स्पष्ट केलीय. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबाबत सकारात्मक विधान केलं. शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी आपल्याला वेळोवेळी सहकार्य केल्याचं ते म्हणाले. या दोन्ही नेत्यांबद्दल सकारात्मक बोलून त्यांनी आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतच राहणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

Follow Us