पत्रकार, विश्लेषक, रोजच्या बैठकांमधले भाजप नेतेही चक्रावून गेले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार, हे कधी ठरलं?

| Updated on: Jun 30, 2022 | 5:56 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात गेमचेंजर अशी प्रतिमा असलेले देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी खरोखरच मास्टरस्ट्रोक लगावून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना एकाच निर्णयात शांत केल्याचं दिसून येतंय.

पत्रकार, विश्लेषक, रोजच्या बैठकांमधले भाजप नेतेही चक्रावून गेले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार, हे कधी ठरलं?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार अस्थिर होईल, कोलमडेल आणि भाजपचं सरकार येईल. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्री होतील. असे आडाखे मागील दहा दिवसांपासूनच नाही तर अडीच वर्षांपासून बांधले जात आहेत. आघाडी सरकारला अडीच वर्ष पूर्ण झाली तेव्हापासून तर अनेक भाजप नेत्यांनी जून महिन्यात सरकार पडेल, असेही दावे केले. पण कुणाचा विश्वास बसत नव्हता. ऐनवेळी एकनाथ शिंदेंनी बंड केलं. दहा दिवसातच निम्म्यापेक्षा जास्त शिवसेना शिंदेसेनेत (Eknath Shinde Group) गेली. महाविकास आघाडी सरकार पाहता पाहता अल्पमतात आलं. भाजपने आपले पत्ते उघडले आणि आज अखेर पर्यायी सरकारची घोषणा झाली. हे सगळं भाकितांप्रमाणे घडलं पण सगळ्यांनाच चक्रावून टाकणारा निर्णय म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी पत्रकार परिषदेत केलेली घोषणा…

फडणवीसांच्या घोषणेने सारेच चक्रावले…

देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद साधारणतः पाच वाजेच्या सुमारास सुरु झाली. तोपर्यंत भाजपच्या गोटातून ऑफ रेकॉर्ड बोलणाऱ्या नेत्यांकडून, अनुभव राजकारण्यांकडून, विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकारांकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. त्यांच्याकडेच गृहखातं असेल. एकनाथ शिंदेंच्या वाट्याला उपमुख्यमंत्री पद आणि फार हलकं खातं येईल, अशा आशयाचे अंदाज बांधले जात होते. पण पत्रकार परिषद सुरु झाली आणि फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून शिंदेंच्या नावाची घोषणा केली तसं समोर माइक धरून बसलेले पत्रकार, विश्लेषक, राजकीय तज्ज्ञ, लाईव्ह ऐकणारी महाराष्ट्रातील कोट्यवधी जनता सारेच अवाक् झाले. अगदी भाजपच्या आतील गोटातील माहिती देणारेही गोंधळले. मुख्यमंत्री देवेंद्र नसून एकनाथ शिंदे… हे कधी ठरलं?

कधी ठरलं?

एकनाथ शिदे हे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा केल्यानंतर जनतेसमोर एकच प्रश्न आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील, हे भाजपच्या कोणत्या बैठकीत ठरलं? एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर भाजपच्या गोटात बैठकांवर बैठका सुरु होत्या. एकिकडे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या बैठका सुरु होत्या. मनधरणी आणि धमक्या असं दोन्ही प्रकारे शिंदेसेनेचं मन वळवणं सुरु होतं. तर तिकडे देवेंद्र फडणवीसांची भाजपच्या कोअर कमिटीसोबत बैठका सुरु होती. या काळात देवेंद्र फडणवीसांच्या काही दिल्लीवाऱ्याही झाल्या. काल म्हणजेच बुधवारी गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्ड यांच्याशी दिल्लीत एक महत्त्वाची बैठक झाली. याच बैठकीत हा महत्त्वाचा मास्टरस्ट्रोक खेळण्याचा निर्णय़ घेण्यात आला असावा, ज्यामुळे भाजप नेतेही चक्रावून गेले असावेत, असं म्हटलं जात आहे. जाहीर रित्या प्रतिक्रिया देताना भाजप नेते आम्हाला हा निर्णय माहिती होता, असे म्हणतायत, पण त्यात कितपत तथ्य आहे, हेही सांगणं कठीण आहे. एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात गेमचेंजर अशी प्रतिमा असलेले देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी खरोखरच मास्टरस्ट्रोक लगावून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना एकाच निर्णयात शांत केल्याचं दिसून येतंय.