EWS Certificate : मराठा समाजाला EWS प्रमाणपत्र देण्याबाबत टाळाटाळ सुरु!, अशोक चव्हाण यांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र

| Updated on: Aug 10, 2022 | 5:10 PM

राज्य शासनाने जिल्हा व तालुका प्रशासनांना तातडीने निर्देश देऊन मराठा समाजाला ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याबाबत कोणताही न्यायालयीन अडसर नसल्याचं स्पष्ट करावं, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.

EWS Certificate : मराठा समाजाला EWS प्रमाणपत्र देण्याबाबत टाळाटाळ सुरु!, अशोक चव्हाण यांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र (EWS Certificate) देण्यास तहसीलदार टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी येत आहे. राज्य शासनाने जिल्हा व तालुका प्रशासनांना तातडीने निर्देश देऊन मराठा समाजाला ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याबाबत कोणताही न्यायालयीन अडसर नसल्याचं स्पष्ट करावं, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल आहे.

अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे की, सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाचे (एसईबीसी) आरक्षण रद्द केले. त्यानंतर त्याकाळात अपूर्णावस्थेत असलेल्या नोकरभरती प्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना आर्थिक दृष्ट्या मागास वर्गाचे (ईडब्ल्यूएस) लाभ देण्याचा निर्णय मागील राज्य सरकारच्या काळात घेण्यात आला होता. मात्र, त्या निर्णयाला उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवलं आहे. त्यामुळे हा निर्णय केवळ अपूर्णावस्थेत असलेल्या नोकरभरती प्रक्रियेतील तत्कालीन एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी होता. त्या निर्णयाचा मराठा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसचे लाभ मिळण्याविषयी काहीही संबंध नाही. तरी देखील तहसीलदार मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यास नकार देत आहेत. सध्या अनेक शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया तसेच नोकरभरती प्रक्रियांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने मुख्यमंत्र्यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.

EWS प्रमाणपत्र का गरजेचे?

EWS प्रमाणपत्र असेल तरत विद्यार्थ्यांना शिक्षण आणि सरकारी नोकरीत लाभ मिळतो. यासोबतच सर्वसाधारण प्रवर्गातील लोकांनाही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. केंद्र सरकारच्या नियमांनुसार ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे आणि ज्या कुटुंबाकडे 5 एकरपेक्षा कमी जमीन आहे, अशा कुटुंबाला EWS प्रमाणपत्र मिळते. तसंच 1 हजार चौरस फूटापेक्षा जास्त जागेवर घर नसावं. जर ती व्यक्ती शहरी भागात राहत असेल तर त्याचे घर 900 चौरस फुटांपेक्षा मोठं नसावं.

EWS प्रमाणपत्रासाठी आधार, पॅन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचा दाखला, रोजगार प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो आणि मोबाईल नंबर आवश्यक आहे.