छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राज्यपालांचं स्पष्टीकरण, काय म्हणाले कोश्यारी?

| Updated on: Feb 28, 2022 | 6:49 PM

छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणा स्थान आहेत. माझी माहिती आणि अभ्यासाप्रमाणे समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत. पण इतिहासातील काही नवीन तथ्य मला काही लोकांनी सांगितले. त्या तथ्यानुसार मी पुढे पाहिल, असं स्पष्टीकरण भगतसिंह कोश्यारी यांनी दिलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राज्यपालांचं स्पष्टीकरण, काय म्हणाले कोश्यारी?
भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल
Follow us on

जळगाव : मराठी भाषा गौरव दिनी राज्यपाल (Governor) भरतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय. राज्यपालांच्या त्या वक्तव्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीका होत आहे. राज्यपालांनी माफी मागावी अशी मागणी लावून धरली जात आहे. अशावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र, माफी मागण्याबाबत केलेल्या प्रश्नावर राज्यपाल कोश्यारी यांनी बगल देत त्यावर बोलणं टाळलं. ते आज जळगावमध्ये बोलत होते.

राज्यपाल म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणा स्थान आहेत. माझी माहिती आणि अभ्यासाप्रमाणे समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत. पण इतिहासातील काही नवीन तथ्य मला काही लोकांनी सांगितले. त्या तथ्यानुसार मी पुढे पाहिल, असं स्पष्टीकरण भगतसिंह कोश्यारी यांनी दिलं आहे. दरम्यान, माफी मागण्याबाबत केलेल्या प्रश्नाला त्यांनी बगल दिली. माफी मागण्याबाबत त्यांनी बोलणं टाळल्याचं पाहायला मिळालं.

राज्यपाल कोश्यारी नेमकं काय म्हणाले होते?

“चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला छोटं नाही म्हणत आहे मी. पण गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं. छत्रपतींनी समर्थांना म्हटलं की, राज्य मला तुमच्या कृपेने मिळालंय. आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले की, ‘या राज्याची चावी मी तुम्हाला देतो’ त्यावर समर्थ म्हणाले की, ‘ही राज्याची चावी मला कुठे देता. तुम्हीच याचे ट्रस्टी आहात”, असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं आहे.

‘माफी मागा,  अथवा गरज पडली तर धोतर फेडू’

मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक विनोद पाटील यांनी औरंगाबादमध्ये बोलताना हा इशारा दिला. ते म्हणाले, ‘महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी काल शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं. माहिती नसलेला इतिहास आमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर हे बघितल्यानंतर राज्यपालांच्या पोटात जे होतं, ते ओठावर आलेलं आहे. राज्यपालजी, आपल्याला जर छत्रपती शिवाजी महाराज कळले नसतील, तर कृपया त्या विषयात नाक खुपसू नका. चुकीच्या गोष्टी आमच्यासमोर मांडू नका, तुमच्या वयाचा विचार करता, तुम्हाला निवृत्तीची गरज आहे, हे कालच्या वक्तव्यावरून स्पष्ट झालं आहे. भारताचे पंतप्रधानांना विनंती आहे, आवाहन आहे की, तात्काळ अशा राज्यपालांची उचलबांगडी करावी. असे राज्यपाल महाराष्ट्राला नको. यांना छत्रपती शिवाजी महाराजच कळलेले नाहीत. राज्यपाल महोदय, आपण तत्काळ माफी मागावी, अन्यथा आम्ही तुमच्या वयाचा विचार न करता गरज पडली तर तुमचं धोतर फेडू. एक शिवभक्त म्हणून या ठिकाणी ठामपणे आपल्याला सांगतो.

सुप्रिया सुळेंकडून राज्यपालांना उत्तर

सुप्रिया सुळे यांनी एकूण पाच ट्विट केले आहेत. व्हिडीओ आणि कोर्टाच्या निर्णयाची कॉपीही सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. 16 जुलै 2018 रोजी दिलेल्या निकालानुसार… ‘तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही. शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरुशिष्याचे नाते असल्याचा देखील कोणताही पुरावा उपलब्ध नाही.’ असं सुप्रिया सुळे यांनी कोर्टाची कागदपत्रं पोस्ट करत म्हटलं आहे.

इतर बातम्या :

Maratha Reservation: तर ठाकरे-पवारांच्या बंगल्यात घुसू; संभाजी छत्रपतींच्या उपोषणानंतर मराठा ठोक मोर्चा आक्रमक

राज्यपालांनी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या, त्वरित विधान मागे घ्या; उदयनराजे भोसले यांची मागणी