अजित पवारांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळ बैठक, राज्यपालांना उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीची आठवण करुन देणार

| Updated on: Apr 27, 2020 | 3:36 PM

उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. 27 मे रोजी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन 6 महिने पूर्ण होत आहेत.  (Governor to be reminded about CM Uddhav Thackeray Appointment as Governor elected MLC)

अजित पवारांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळ बैठक, राज्यपालांना उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीची आठवण करुन देणार
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीबाबत राज्याचे मंत्रिमंडळ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना स्मरण करुन देण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या आज होणाऱ्या बैठकीत प्रस्ताव मंजूर करुन तो राज्यपालांना पाठवला जाण्याची चिन्हं आहेत. उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीवरुन राजकारण होत असल्याचा शिवसेनेला संशय आहे. (Governor to be reminded about CM Uddhav Thackeray Appointment as Governor elected MLC)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. बैठकीच्या अजेंड्यावर हा विषय नसला, तरी ऐनवेळी तो अजेंड्यावर आणला जाण्याची शक्यता आहे. याआधी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीने उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेवरील नेमणुकीबाबत ठराव एकमताने मंजूर करुन राज्यपालांकडे पाठवला होता.

राज्यपालांचा अद्याप निर्णय नाही

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 6 महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषद या विधिमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाचं सदस्य होणं संविधानानुसार बंधनकारक असतं. अन्यथा, मंत्र्याचं पद धोक्यात येण्याची शक्यता असते. उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. 27 मे रोजी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन 6 महिने पूर्ण होत आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे विधानपरिषदेची निवडणूक लांबणीवर पडली आहे. सध्या राज्यपाल नियुक्त दोन जागा रिक्त आहेत. त्यातल्या एका जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस 6 एप्रिलला राज्यपालांकडे करण्यात आली आहे. (Governor to be reminded about CM Uddhav Thackeray Appointment as Governor elected MLC)

याआधी मंत्रिमंडळाने शिफारस केलेल्या दोन नियुक्त्या राज्यपालांनी फेटाळल्या आहेत. या फेटाळलेल्या 2 जागांपैकी एका जागेवर उद्धव ठाकरेंची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे जरी नेमणूक केली, तरी ही नेमणूक ही मूळ सदस्याच्या कालावधीपुरतीच असेल. त्यामुळे सर्व 12 सदस्यांची एकदाच नियुक्ती व्हावी, असं राज्यपालांचं मत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

येत्या काही दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आमदारकीबाबत निर्णय घेतला गेला नाही, तर राज्यपालांना शिफारस स्वीकारण्याबद्दल पुन्हा विनंती करावी लागेल. अन्यथा 3 मेनंतर लॉकडाऊन संपल्यानंतर लगेचच निवडणूक घेता येऊ शकते. मात्र निवडणूक घेण्यासाठी किमान 12 दिवस हवे. उद्धव ठाकरे यांना 27 मे रोजी मुख्यमंत्री होऊन 6 महिने पूर्ण होतील. त्याआधी आमदारकी मिळवणं आवश्यक आहे. लॉकडाऊननंतर 4 ते 27 मे असा 24 दिवसांचा कालावधी मिळतो.

राज्यपाल कोट्यातून घटनात्मकदृष्ट्या उद्धव ठाकरे आमदार होऊच शकत नाहीत, असं काही दिवसांआधीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. तर राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती.