काँग्रेसचाही राष्ट्रवादीच्या सुरात सूर, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नाही- बाळासाहेब थोरात

| Updated on: Mar 22, 2021 | 6:10 PM

देशमुखांच्या राजीनामाच नाही तर चौकशीही गरज नसल्याचं पवारांनी म्हटलंय. आता काँग्रेसनंही राष्ट्रवादीच्या सुरात सूर मिसळल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय.

काँग्रेसचाही राष्ट्रवादीच्या सुरात सूर, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नाही- बाळासाहेब थोरात
Follow us on

मुंबई : परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी भाजप नेते आक्रमकपणे करत आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देशमुखांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. देशमुखांच्या राजीनामाच नाही तर चौकशीही गरज नसल्याचं पवारांनी म्हटलंय. आता काँग्रेसनंही राष्ट्रवादीच्या सुरात सूर मिसळल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय.(Anil Deshmukh does not need to resign after Parambir Singh’s letter, says Balasaheb Thorat)

‘देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नाही’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. दीड तासांपेक्षा अधिक काळ ही बैठक चालली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं म्हटलंय. सरकारची किंवा काँग्रेसची प्रतिमा खराब होण्याचं काही कारण नाही. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन प्रकरणाची चौकशी व्हावी आणि ती चांगल्या रितीने व्हावी, असं थोरात यांनी म्हटलंय.

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलाय. देशमुखांनी सचिन वाझेला महिन्याला 100 कोटीच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, यासह अनेक गंभीर आरोप सिंग यांनी पत्रात केले आहेत. हे पत्रा पाठवण्यामागे परमबीर सिंग यांच्यावर कुठलातरी दबाव आहे. त्यातूनच त्यांनी हे पत्र दिलं असावं असं वाटतं. पत्र दिलं गेलं म्हणून राजीनामा घेणं, हे योग्य नसल्याचं थोरात यांनी म्हटलंय. तर सत्ता नसल्यामुळे भाजप नेते अस्वस्थ आहेत. या अस्वस्थतेतूनच सातत्याने राष्ट्रपती राजवटीची मागणी होत असल्याचं थोरात म्हणाले.

शरद पवार देशमुखांच्या पाठीशी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्राची चिरफाड केली. गृहमंत्री फेब्रुवारीच्या संबंध महिन्यात कोरोनामुळे रुग्णालय आणि नंतर होम आयसोलेशनमध्ये होते. मग देशमुखांनी सचिन वाझेंना बोलावून वसुलीचे आदेश दिले असं सिंग कशाच्या आधारावर म्हणतात? असा सवाल करतानाच वाझे-देशमुख भेटीची माहिती चुकीची असल्याचा दावा शरद पवार यांनी केला.

देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही

सिंग यांनी जे आरोप केले आहेत. त्या कालावधीत देशमुख रुग्णालयात होते. त्यामुळे त्यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये आता ताकद राहिली नाही, अनिल देशमुख मुंबईत नव्हते, रुग्णालयात होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही. देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

चौकशीचा प्रश्न आला कुठून?

अनिल देशमुख यांची चौकशी करणार का? असा सवाल पवारांना करण्यात आला. त्यावर पवारांनी थेट यूटर्न घेतला. आता आलेल्या कागदपत्रावरून देशमुख हे मुंबईत नव्हतेच. ते नागपूरला होते आणि कोरोनावर उपचार घेत होते. त्यामुळे सिंग यांनी केलेले आरोप खोटे असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे चौकशीचा प्रश्नच येत नाही, असं पवार म्हणाले. तसेच तरीही चौकशी करावी की करू नये हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्याबाबत मी कालही बोललो होतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या :

मी आनंदी आहे, आता ATS करेक्ट कार्यक्रम करेल, राजधानीत शरद पवारांचा हुंकार

परमबीर सिंग यांची सर्वोच्च न्यायालयात धाव, गृहमंत्री देशमुखांच्या घरातील सीसीटीव्ही तपासा!

Anil Deshmukh does not need to resign after Parambir Singh’s letter, says Balasaheb Thorat