अजित पवारांकडून राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचं पाठिंबा पत्र मिळालं, गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट

| Updated on: Nov 23, 2019 | 11:54 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी राज्यपालांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचं पाठिंबा पत्र दिलं आहे. आमच्याकडे 170 हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे, असा दावा भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी (Jayant Patil and Girish Mahajan on government formation) केला आहे.

अजित पवारांकडून राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचं पाठिंबा पत्र मिळालं, गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट
Follow us on

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी राज्यपालांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचं पाठिंबा पत्र दिलं आहे. आमच्याकडे 170 हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे, असा दावा भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी (Jayant Patil and Girish Mahajan on government formation) केला आहे. दुसरीकडे जयंत पाटील यांनी पक्ष शरद पवार यांच्यासोबत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याची चर्चा होत आहे.

गिरीश महाजन म्हणाले, “भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. राष्ट्रवादीचे 54-55 आणि आमचे 105 भाजपचे आमदार आहेत. याव्यतिरिक्त अनेक अपक्ष आमदार देखील आमच्यासोबत आहेत. मला वाटतं आम्हाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या 170 च्या पुढे जाईल. आम्ही महाराष्ट्राला पुढील 5 वर्ष स्थिर सरकार देऊ. अजित पवार हे राष्ट्रवादीच्या विधीमंडळाचे नेते आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना दिलं आहे. याचाच अर्थ संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यासोबत आहे.”

पक्ष शरद पवार यांच्यासोबत, ते जो निर्णय घेतील तेच होईल : जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील फूट पडल्याचं दिसत आहे. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर बोलताना पक्ष शरद पवार यांच्यासोबत असल्याचं म्हटलं आहे. तसेच शरद पवार सांगतील तेच होईल, असाही विश्वास व्यक्त केला.

जयंत पाटील म्हणाले, “आज सकाळी पुन्हा बैठक घेण्याचं ठरलं होतं. त्यामुळे आज हा प्रश्न बराच सुटला असता. राष्ट्रवादीचे आमदार फुटल्याची चर्चा कृपया करु नका. पक्ष शरद पवार यांच्यासोबत राहिल, अशी मला खात्री आहे. ते जे सांगितील तेच होईल.”

आमदारांना कोठेही हलवण्याची गरज नाही. माझा आमदारांशी संपर्क झाला आहे. थोडासा वेळ माध्यमांनी थांबावं. अधीर होऊ नका. मी शरद पवार यांच्याकडे चाललो आहे. तेथे जाऊन मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यानंतरच पुढील माहिती देतो, असंही जयंत पाटील यांनी नमूद केलं.