नवी दिल्ली : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, महाराष्ट्रातून काही प्रकल्प राज्याबाहेर गेले. त्या प्रकल्पांच्या मोबदल्यात राज्याला काहीही मिळालेलं नाही. गुजरात डायमंड हब आहे. त्याचा त्यांना फायदा मिळणाराय. कर्नाटकाला ५ हजार ३०० कोटी रुपये देण्यात आले. महाराष्ट्राला (Maharashtra) या अर्थसंकल्पातून काहीही मिळालेलं नाही. केंद्र सरकार मुंबईसोबत नेहमी अन्याय करते. हे या अर्थसंकल्पातून सिद्ध झालंय. महिलांच्या सक्षमीकरणासाठी कोणतीही तरदूत या अर्थसंकल्पात केली गेली नसल्याचा आरोपही प्रियंका चतुर्वेदी यांनी केलाय.
शिक्षणाकडं दुर्लक्ष केलं गेलं. मनरेगाचा बजेट कमी करण्यात आलाय. जगात महागाई वाढत आहे. यावर काय उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे. यावर कोणतीही तरतूद केली गेली नाही, असंही प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीस म्हणतात की, विरोधकांच्या टीकेत दम नाही. यावर बोलताना प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस यांच्यातच खऱ्या अर्थानं दम राहिला नाही. त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं. आजकाल ते महाराष्ट्राची सेवा कमी करत आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सेवा करण्यासाठी लागले आहेत.
ही वास्तविकता आहे. महाराष्ट्राला या बजेटमध्ये काहीही मिळालं नसल्याचंही प्रियंका चतुर्वेदी यांचं म्हणण आहे. कोणतेही प्रकल्प राज्यात येणार नाहीत. विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आली नाही.
मुंबई अर्थव्यवस्थेचे ग्रोथ इंजीन आहे. पण, मुंबई किंवा महाराष्ट्रासाठी कोणतीही ठोस घोषणा नाही. तरीही देवेंद्र फडणवीस हे राज्यावरील अन्याय लपवत असतील तर ही दुःखद घटना असल्याचंही प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हंटलं.
राज्यातील असंविधानिक सरकारकडून राज्यावर अन्याय होत आहे. केंद्र सरकारही महाराष्ट्रकडं लक्ष देत नाही. याबद्दल संसदेच्या अधिवेशनात आवाज उचलणार असल्याचं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या. हिंडनबर्गच्या रिपोर्टचाही विषय संसदेत मांडू. याशिवाय महाराष्ट्रासाठी आवाज उचलणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.