Maharashtra Politics | निवडणुका होणार, असं घाबरवून आमदारांना धमक्या देताय? राऊतांच्या ट्विटवर नितेश राणेंचा पलटवार

| Updated on: Jun 22, 2022 | 12:49 PM

कालपर्यंत एकनाथ शिंदे यांनी 35 आमदारांसह बंड केल्याचं सांगितलं जात होतं. मात्र काल रात्री खुद्द एकनाथ शिंदे माध्यमांसमोर आले. आपल्याकडे 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केलाय.

Maharashtra Politics | निवडणुका होणार, असं घाबरवून आमदारांना धमक्या देताय? राऊतांच्या ट्विटवर नितेश राणेंचा पलटवार
Follow us on

मुंबईः महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने… असं सूचक ट्विट संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. राऊतांनी केलेलं हे वक्तव्य नेमकं कुणाला सूचना देतंय. एक तर सरकार बरखास्तीसाठी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) मनाची तयारी करावी की सरकारमध्ये असलेल्या इतर आमदारांसाठी हा इशारा आहे? चर्चा अनेक अंगांनी सुरु आहेत. मात्र भाजप नेते नितेश राणे यांनी राऊतांना याच वक्तव्यावरून सुनावलं आहे. निवडणुका होणार, असं सांगून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आमदारांना घाबरवत आहेत. धमक्या देत आहेत, असा पलटवार नितेश राणेंनी केलाय. शिवसेनेतील मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. माझ्याकडे 40 पेक्षा जास्त आमदारांचं पाठबळ आहे, असा दावा शिंदेंनी केला आहे. हा दावा खरा असेल तर शिवसेनेचं संख्याबळ महाविकास आघाडी सरकार टिकवून ठेवण्यासाठी अपुरं आहे.

नितेश राणेंचं ट्विट काय?

महाराष्ट्र मध्यावधी निवडणुकांच्या दिशेने, असं सूचक ट्विट संजय राऊत यांनी केल्यानंतर नितेश राणे यांनी त्यांना प्रतिक्रिया दिलीय. ट्विटमध्ये नितेश राणे म्हणतात, संजय राऊत यांना संविधान आणि त्यातील तरतुदी कळण्याचा प्रश्नच येत नाही. निवडणुका होणार, असे घाबरवून आमदारांना धमक्या काय देताय? सरकार वाचविण्यासाठी ? चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार, विकास पर्व पुन्हा नव्याने सुरु होणार!

संजय राऊतांचं ट्विट काय?

महाविकास आघाडी सरकारला एकानंतर एक मोठे धक्के बसू लागल्यानंतर अखेर सरकार बरखास्त होणार, अशी मनाची तयारी शिवसेनेनंही केलेली दिसतेय. संजय राऊतांनी आज माध्यमांशी बोलताना तशी प्रतिक्रियाही दिली. जास्तीत जास्त काय होऊ शकेल, सत्ता जाऊ शकेल… अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यानंतर काही वेळातच त्यांनी अत्यंत सूचक ट्विट केलं.

रात्रीतून काय घडलं?

कालपर्यंत एकनाथ शिंदे यांनी 35 आमदारांसह बंड केल्याचं सांगितलं जात होतं. मात्र काल रात्री खुद्द एकनाथ शिंदे माध्यमांसमोर आले. आपल्याकडे 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केलाय. कालपर्यंत सूरतमध्ये असलेले सर्व आमदार आणि एकनाथ शिंदे सध्या रात्रीतून गुवाहटीत दाखल झाले आहे. त्यामुळे बंडाचा झेंडा उगारलेले हे सर्वजण शिवसेनेच्या रेंजमधूनच बाहेर गेल्यात जमा आहेत. आता गुवाहटीतून महाराष्ट्रातील सत्तेची समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न होत आहे.