अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात, पंकजांची भूमिका 12 डिसेंबरला स्पष्ट होईल : संजय राऊत

| Updated on: Dec 02, 2019 | 1:17 PM

अनेक भाजप नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. ते नाशिकमध्ये बोलत होते.

अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात, पंकजांची भूमिका 12 डिसेंबरला स्पष्ट होईल : संजय राऊत
Follow us on

नाशिक : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी पुढील प्रवास ठरवण्यासाठी कार्यकर्त्यांशी संवादाचं आयोजन केलं आहे. विधानसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे (Sanjay Raut Pankaja Munde) नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र पंकजा मुंडेच्या भूमिकेवर 12 तारखेलाच आपल्याला कळेल. अनेक भाजप नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. ते नाशिकमध्ये बोलत होते. (Sanjay Raut Pankaja Munde)

पंकजा मुंडे यांनी काल फेसबुक पोस्ट लिहून कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली होती.  तर दुसरीकडे पंकजा मुंडेंच्या ट्विटर हॅण्डलवरुन भाजप गायब असं चित्र आहे. पंकजांनी आपल्या ट्विटर हॅण्डलमध्ये कुठेही भाजपचा उल्लेख केलेला नाही. पंकजा मुंडे येत्या 12 तारखेला कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. 12 डिसेंबर हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जन्मदिवस. त्यामुळेच जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर संवाद साधण्यासाठी पंकजांनी कार्यकर्त्यांना साद घातली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊत यांना पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत म्हणाले, “अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत, पंकजा मुंडेची भूमिका 12 डिसेंबरला स्पष्ट होईल”

‘फडणवीसांची महाराष्ट्राशी बेईमानी’

दरम्यान, संजय राऊत यांनी भाजप खासदार अनंत हेगडे यांनी देवेंद फडणवीसांबाबत केलेल्या खळबळजनक दाव्यावरुनही तोफ डागली. “देवेंद्र फडणवीस यांनी 40 हजार कोटी रुपये परत देण्याचा निर्णय घेतला असेल तर ती महाराष्ट्राशी बेईमानी आहे. त्यांना विधानसभाची पायरी चढण्याचा अधिकार नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खुलासा करतील, यात काळंबेरं नक्कीच आहे, सत्य समोर येईल”, असं संजय राऊत म्हणाले.

आरेप्रमाणे नाणार प्रकल्पात आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील, असंही संजय राऊत म्हणाले.

बुलेट ट्रेनच्या उपयुक्ततेबाबत शरद पवार यांनीही शंका उपस्थित केली होती. त्यामुळे त्याबाबत लवकरच निर्णय स्पष्ट होईल, राज्य सरकारचे पैसे जाणार असतील तर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

गृहमंत्रीपद शिवसेना की राष्ट्रवादी आणि मंत्रिमंडळ विस्तार कधी करायचा याबाबत सर्वस्वी उद्धव ठाकरे यांचा अधिकार आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून मतभेद किंवा भांडणं नाहीत, असा दावा राऊत यांनी केला.