जेव्हा शरद पवारांची साथ सोडलेले 52 आमदार पुढच्या निवडणुकीत पडले!

| Updated on: Sep 22, 2019 | 4:33 PM

1980 मधील निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या पक्षाचे साठ आमदार निवडून आले होते. त्या वेळी 15 दिवसांसाठी ते परदेशात गेले असताना काही मंडळींनी सत्तेचं आमिष दाखवून आमदार फोडले होते. पवार परत आले, तेव्हा त्यांच्याबरोबर केवळ सहा आमदार उरले होते.

जेव्हा शरद पवारांची साथ सोडलेले 52 आमदार पुढच्या निवडणुकीत पडले!
Follow us on

मुंबई : विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली होती. राष्ट्रवादीचे काही आमदार पक्षाची साथ सोडून जात असताना सत्ताधाऱ्यांनी शरद पवार एकटे पडल्याची टीका केली. मात्र आमदारांनी पवारांची साथ सोडण्याची (MLAs who left Sharad Pawar) ही पहिलीच वेळ नाही. त्यामुळे, त्यावेळी पवारांना सोडून गेलेल्या आमदारांचं काय झालं होतं, हे जाणून घेणं रंजक ठरणार आहे.

सोडून गेलेल्यांविषयी बोलायचं नाही, हे धोरण शरद पवारांनी पाळलं आहे. त्यांचं काय करायचं, ते मी बघतो असा इशारा पवारांनी एका सभेतून दिला. काही माणसं गेली, तरी त्याची मला चिंता नाही. 1980 मध्ये 52 आमदार मला सोडून गेले होते, पण पुढच्या निवडणुकीत त्यातला एकही निवडून आला नाही, अशी आठवण शरद पवारांनी सांगितली.

1980 मधील निवडणुकीमध्ये माझ्या पक्षाचे साठ आमदार निवडून आले होते. त्या वेळी 15 दिवसांसाठी मी परदेशात गेलो असताना काही मंडळींनी सत्तेचं आमिष दाखवून आमदार फोडले (MLAs who left Sharad Pawar) होते. मी परत आलो, तेव्हा माझ्याबरोबर केवळ सहा आमदार उरले होते. 1985 मधल्या निवडणुकीत पुन्हा सहाचे साठ आमदार करुन दाखवले होते, असं शरद पवारांनी सांगितलं.

काय घडलं होतं?

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975 ते 1977 या कालावधीत देशव्यापी आणीबाणी जाहीर केली होती. मार्च 1977 च्या लोकसभा निवडणुकांनंतर 21 मार्च 1977 रोजी आणीबाणी उठली. त्यावेळी काँग्रेसला दणदणीत पराभवाचा सामना करावा लागला होता. जनता पक्षाचे मोरारजी देसाई पंतप्रधानपदी निवडून आले. ते भारताचे पहिले काँग्रेसेतर पंतप्रधान ठरले होते.

आणीबाणीचा परिणाम काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात झाला होता. 1978 मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली आणि यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी काँग्रेसची स्थापना झाली.

महाराष्ट्रात पुलोद सरकार

1978 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पुलोद सरकार स्थापन झालं. शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 1980 साली इंदिरा गांधींचं सत्तेत पुनरागमन झालं आणि त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकार बरखास्त केली. यामध्ये शरद पवारांच्या सरकारचाही समावेश होता.

जून 1980 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 288 पैकी 186 जागा जिंकल्या. समाजवादी काँग्रेसला फक्त 47 जागा जिंकता आल्या होत्या. बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री झाले. त्यावेळी शरद पवार विधानसभेतील प्रमुख विरोधी नेते होते.

पवारांचा दौरा आणि आमदारांनी साथ सोडली

विधानसभेत निवडून आलेले आमदार एक-एक करत शरद पवारांची साथ सोडत गेले. शरद पवार कामानिमित्त लंडन दौऱ्यावर गेले असताना मोठ्या संख्येने आमदारांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. फक्त सहा आमदार (MLAs who left Sharad Pawar) शरद पवार यांच्यासोबत राहिले. त्यामुळे पवारांचं विरोधी पक्षनेतेपदही गेलं होतं.

पवारांनी उदयनराजेंविरोधात दंड थोपटले, साताऱ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन

1984 मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली आणि काँग्रेसचं नेतृत्व राजीव गांधींकडे गेलं. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसने 404 जागा मिळवल्या. समाजवादी काँग्रेसचे फक्त चारच खासदार निवडून आले. यापैकी शरद पवार हे देशात दुसऱ्या क्रमांकांच्या मताधिक्याने निवडून आलेले खासदार होते.

1985 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शरद पवारांनी तरुण आणि नवख्या उमेदवारांना संधी दिली आणि 54 आमदार निवडून आणले होते.

यंदाही राष्ट्रवादीच्या डझनभर आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. या आमदारांचं काय होणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.