डोंबिवलीत खड्ड्यांवरुन राजकारण तापले, मनसे विरुद्ध भाजपमध्ये खडाजंगी

| Updated on: Sep 09, 2019 | 9:22 AM

डोंबिवलीत खड्ड्यांमुळे (Pothole) राज ठाकरे (Raj thackeray) यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला होता. त्यामुळे खड्ड्यांवरुन डोंबिवलीतील राजकारण तापले आहे.

डोंबिवलीत खड्ड्यांवरुन राजकारण तापले, मनसे विरुद्ध भाजपमध्ये खडाजंगी
Follow us on

ठाणे : डोंबिवलीत खड्ड्यांमुळे (Pothole) राज ठाकरे (Raj thackeray) यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला होता. एवढेच नाही तर जेष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर (Hridaynath Mangeshkar) यांनी सुद्धा डोंबिवलीतील खड्ड्यांविषयी संताप व्यक्त केला होता. त्यामुळे आता खड्ड्यांवरुन डोंबिवलीतील राजकारण तापले आहे.

एकीकडे मनसेने भाजपच्या राज्यमंत्र्यांवर निशाना साधला आहे. तर राज्यमंत्र्यांनी येणाऱ्या दिवसात 471 कोटींचे रस्ते होणार असल्याचा दावा केला आहे. मात्र तोंडाने असे दावे करणं सोपं असल्याचं म्हणत मनसेने राज्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर  टीका केली आहे.

कल्याण डोंबिवलीमध्ये वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. गणेशोत्सवादरम्यान खड्डे बुजवले जातील अशी नागरिकांना आशा होती. मात्र रस्त्यावर खड्यांची संख्या वाढत गेली. मनसे प्रमुख राज ठाकरे शनिवारी (7 सप्टेंबर) डोंबिवलीत आले आणि त्यांना खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. यावर मनसे आक्रमक झाली आहे. मनसेने या आधीही खड्ड्यांसाठी केडीएमसी महानगर पालिकेला खड्डे रत्न पुरस्कार दिला होता. मात्र राज ठाकरे यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. त्यानंतर मनसेने पत्रकार परिषद घेत भाजप आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.

डोंबिवलीत येणाऱ्या काळात 471 कोटींचे रस्ते होणार अशी घोषणा राज्यमंत्र्यांनी केली होती. ही घोषणा फक्त निवडणुकीच्या तोंडावर दाखविण्यात आलेलं गाजर असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

दरम्यान, यंदा मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीमधील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. महापालिका क्षेत्रातील जवळपास सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यांमुळे दररोज वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील खड्डे बुजविण्यात पालिका अपयशी ठरल्याने बाप्पाचे विसर्जन खड्ड्यातून करावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.