अजित पवार सरकार चालवत आहेत, नंतर शिवसेनाही चालवतील : अविनाश जाधव

| Updated on: Feb 09, 2020 | 11:38 AM

मनसेचा हा मोर्चा भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप शिवसेनेने केला. त्यानंतर आता मनसेने शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे.

अजित पवार सरकार चालवत आहेत, नंतर शिवसेनाही चालवतील : अविनाश जाधव
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबईत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात आज (रविवार 9 फेब्रुवारी) मोर्चा काढत आहे(Raj Thackeray MNS Maha Morcha) . मात्र, मनसेचा हा मोर्चा भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप शिवसेनेने केला. त्यानंतर आता मनसेने शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे (Shivsena vs MNS). “अजित पवार हे सरकार चालवत असून थोड्या दिवसांनी शिवसेना देखील चालवतील”, अशी खोचक टीका मनसे नेते अविनाश जाधव यांनी  शिवसेनेवर केली आहे.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा गळा घोटला आहे. सध्या शिवसेना नाही, तर अजित पवार सरकार चालवत आहेत. थोड्या दिवसांनी शिवसेना देखील ते चालवतील, राज्य सरकार अजित पवार पुरस्कृत आहे”, अशी टीका अविनाश जाधव यांनी केली. तसेच, “बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार राज ठाकरे आहेत”, असंही ते म्हणाले.

मनसेचा महामोर्चा

मुंबईत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात आज मनसेचा मोर्चा निघणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात दुपारी बारा वाजता मोर्चाला सुरुवात होईल. त्यानंतर ते आझाद मैदानावरील सभेला संबोधित करतील.

मोर्चाचा मार्ग कोणता?

राज ठाकरे यांच्या नेतृत्वात दुपारी बारा वाजता हिंदू जिमखान्यापासून मनसेच्या मोर्चाला सुरुवात होईल. त्यानंतर आझाद मैदानावर पोहचल्यानंतर राज ठाकरे संध्याकाळी सभेला संबोधित करतील. राज्यभरातील मनसैनिक मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.

मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करणारे बॅनर मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. अगदी ‘मातोश्री’समोरही मनसेने पोस्टरबाजी केली होती. सोशल मीडियातूनही मनसेने मोर्चासाठी चांगलीच ‘मोर्चेबांधणी’ केली आहे.

मोर्चासाठी दोन ते तीन लाख जण येण्याची शक्यता मनसे पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. यासाठी मुंबईतील आझाद मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे. भव्य स्टेज उभारण्यात आला असून दोन लाख जणांसाठी आसनव्यवस्थाही करण्यात आली आहे.

आझाद मैदानात उभारलेल्या भव्य स्टेजवर आधी मनसे नेत्यांची भाषणं होतील. अखेरीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण होईल. हा मोर्चा का काढण्यात आला आहे, याचा उद्देश काय, हे राज ठाकरे आपल्या भाषणातून जाहीर करतील. यानंतर मोर्चाची सांगता होईल.