विधिमंडळ अधिवेशनात सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खडाजंगी; नाना पटोलेंच्या प्रश्नांना मंत्री धनंजय मुंडे यांचं उत्तर

Maharashtra Assembly Monsoon Session : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधक आक्रमक, नाना पटोलेंचा प्रश्न धनंजय मुंडेंचं उत्तर; म्हणाले, हवा तो प्रश्न विचारा...

विधिमंडळ अधिवेशनात सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खडाजंगी; नाना पटोलेंच्या प्रश्नांना मंत्री धनंजय मुंडे यांचं उत्तर
आयेशा सय्यद | Updated on: Jul 19, 2023 | 12:45 PM

मुंबई | 19 जुलै 2023 : सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. विविध मुद्द्यांवरून हे अधिवेशन गाजतं आहे. अशात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना विरोधक प्रश्न विचारत आहेत. हवा तो प्रश्न विचारा मी उत्तर देतो, असं म्हणत धनंजय मुंडे उत्तरले.

नाना पटोले यांचे प्रश्न

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी शेतीच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधलं. राज्यात बियाणं आणि खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, त्याबाबत सरकारचं काय नियोजन आहे. हे सगळं खरं आहे का? बॅंका शेतकऱ्यांना कर्ज देत नसल्यामुळे त्यांना सावकाराकडून कर्ज घ्यावं लागतंय. दागिने विकून शेतकऱ्यांना शेती करण्याची वेळ येत आहे. हे खरं आहे का? हे विचारलं गेलं तेव्हा हे खरं नाही, असं सांगण्यात आलं. हे सरकार शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम करतं आहे. माझ्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरांवरून हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत गंभीर नसल्याचं दिसतं आहे. बोगस बियाणांच्या बाबत जो भ्रष्टाचारावर सरकार कारवाई का करत नाही?, असं नाना पटोले म्हणाले.

धनंजय मुंडे यांचं उत्तर

धनंजय मुंडे यांचं उत्तर खतांचे भाव वाढलेले नाहीत. ते स्थिर आहेत. केंद्र सरकारने खतांच्या किमती वाढवलेल्या नाहीत, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.

2021 मध्ये 20 हजार 217 कोटी रुपयांचं कर्ज वाटप झालं. 2022 मध्ये 24 हजार 959 कोटी रुपयांचं कर्ज वाटप झालं. यंदाचा खरीप हंगाम अद्याप संपलेला नाही. 31 जुलैपर्यंत हे कर्ज मिळणार आहे. 28 हजार 226 कोटी रुपयांचं कर्जवाटप झालेलं आहे. मागच्या दोन वर्षापेक्षा या वर्षी जास्तीचं कर्ज वाटप झालेलं आहे. राज्यातील 49 टक्के शेतकऱ्यांना खरीपाचं कर्ज वाटप करण्यात आलं आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.

बोगस बियाण्यांच्या मुद्द्यावर कायदा आणणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी सागितलं. शिवाय जो काही प्रश्न असेल तो विचारा मी त्याला उत्तर देतो, असं धनंजय मुंडे म्हणाले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांनाी सभात्याग केला. त्यावर धनंजय मुंडे यांनी घणाघात केला. विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्यपूर्वक बघत नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांची उत्तर दिलेली असताना ते सभात्याग करतात, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us