राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेसोबत आघाडी होणार की नाही? अजित पवारांचं कार्यकर्त्यांना उद्देशून मोठं विधान

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कामाला लागला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेसोबत आघाडी होणार की नाही? अजित पवारांचं कार्यकर्त्यांना उद्देशून मोठं विधान
| Edited By: | Updated on: Nov 04, 2022 | 5:07 PM

अहमदनगर : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात घडामोडींना वेग आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आजपासून शिर्डीत चिंतन शिबीराचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मोलाच्या सूचना दिल्या. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागा, अशा सूचना अजित पवारांनी दिल्या. विशेष म्हणजे अजित पवारांनी यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला शिवसेना आणि काँग्रेस पक्षासोबत आघाडी राहील का याबाबतदेखील महत्त्वाची माहिती दिली.

“आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी पक्ष शिवसेनेसोबत जाण्याचा विचार करतोय. याबाबत प्रांतिक पातळीवर निर्णय कळविला जाईल. पण तोवर एकट्याने स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा”, असं अजित पवार कार्यकर्त्यांना उद्देशून स्पष्टपणे म्हणाले.

“आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये आघाडीची वाट पाहत बसू नका. त्याबाबतचा निर्णय लवकरच होईल. मात्र तूम्ही कामाला लागा. आघाडीची वाट पाहत बसण्यापेक्षा स्वबळावर लढण्याची तयारी करा”, अशी महत्त्वाची सूचना अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिली आहे.

“आपली ताकद स्थानिक पातळीवर दिसली तरच मित्र पक्ष आपल्यासोबत चर्चा करायला येतील”, असंदेखील अजित पवार शिर्डीतील चिंतन शिबिरात कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.

अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सावधगिरीचा सल्ला

शिर्डीतील चिंतन शिबीरमध्ये भाषण करताना अजित पवारांनी आपल्या पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांना देखील मोलाचा सल्ला दिला. “ते आपल्या पक्षातील लोकांना पण आमिष दाखवत आहेत. आपल्या लोकांनाही काही सांगत आहेत. पण त्यांच्या आश्वासनाला बळी पडू नका”, असं आवाहन अजित पवारांनी केलंय.

“जे पक्ष सोडून गेले त्यांना आता पश्चाताप होतोय. त्यांना वाटतं जे केलं ती चूक झाली. ज्या घरात वाढलो ते घर उद्ध्वस्त करणं योग्य नाही. शिवसेनाबाबत जे घडलं, त्याने नाव गेलं, हे महाराष्ट्रातील जनतेला आवडले नाही”, असं अजित पवार म्हणाले.