राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्याचे चिरंजीव भाजपच्या गळाला?

| Updated on: Jul 25, 2019 | 7:27 AM

अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेचे आमदार वैभव पिचड (MLA Vaibhav Pichad) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वैभव पिचड (MLA Vaibhav Pichad) हे लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय.

राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्याचे चिरंजीव भाजपच्या गळाला?
Follow us on

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरु झाल्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार भाजपच्या गळाला लागल्याचं बोललं जातंय. अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेचे आमदार वैभव पिचड (MLA Vaibhav Pichad) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वैभव पिचड (MLA Vaibhav Pichad) हे लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासोबत वैभव पिचड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

वैभव पिचड यांचे वडील मधुकर पिचड हे अनेक वर्ष मंत्री होते. राज्याच्या आदिवासी मंत्रालयाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. विशेष म्हणजे मुधकर पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. अनेकदा त्यांना मंत्रिपदही मिळालं होतं.

राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या मधुकर पिचड यांचाच मुलगा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता आहे.

वैभव पिचड यांची मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीवर प्रतिक्रिया कळू शकली नाही. पण वैभव पिचड हे शिवसेना किंवा भाजपात जाणार असल्याच्या चर्चा त्यांच्या मतदारसंघातही गेल्या अनेक दिवसांपासून होत आहेत.

मधुकर पिचड यांनी अकोल्यातून मुलाला उमेदवारी दिली होती. वैभव पिचड सध्या बंदीस्त कालव्यांसाठी आंदोलन करत आहेत. निळवंडेच्या कालव्यांना वैभव पिचड यांचा विरोध आहे.

उघड्या कालव्यांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं, असं त्यांचं म्हणणं आहे. या आंदोलनांसाठी मतदारसंघात सक्रिय असणारे वैभव पिचड आता भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उत गेलाय.

दरम्यान, गेल्या काही महिन्यात राष्ट्रवादीच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केलाय. शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य असलेले जयदत्त क्षीरसागर यांनीही लोकसभा निवडणुकीनंतर शिवबंधन बांधलं होतं. आणखी अनेक आमदार भाजपात येणार असल्याचा दावा शिवसेना आणि भाजपकडून कायम केला जातोय.