मुंबईचा पुढचा महापौर भाजपचाच : राम कदम

| Updated on: Dec 08, 2019 | 6:49 PM

विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडून थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसोसोबत जाऊन सरकार स्थापन केले. यानंतर भाजप-शिवसेनेत वाद सुरु असल्याचे दिसत आहे.

मुंबईचा पुढचा महापौर भाजपचाच : राम कदम
ram kadam
Follow us on

मुंबई : विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडून थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन सरकार स्थापन केले. यानंतर भाजप-शिवसेनेत वाद सुरु असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं आहे. येणारा मुंबईचा महापौर हा भाजपचाच असणार, असा दावा भाजपचे आमदार राम कदम (Ram kadam criticized on shivsena government) यांनी केला.

“मुंबईचा पुढचा महापौर भाजपचा असणार, त्या दृष्टीने आमची मजबूत तयारी सुरु आहे. गेल्यावेळी आम्ही एक ते दोन जागांवर कमी पडलो होतो. पण आता मुंबईचा महापौर भाजपचा असेल”, असं आमदार राम कदम (Ram kadam criticized on shivsena government) म्हणाले.

मुंबई महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपकडून मुंबईत मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. तसेच बैठकाही आोयजित केल्या जात आहेत.

महाविकासआघाडी सरकारला आमदार फुटण्याची भीती

“हे सरकार स्थापन होऊन 11 दिवस झाले. तरीही अजून खातेवाटप करता आले नाही. मंत्रिपद कुणाला द्यायचे याचा विचार हे सरकार करत आहेत. त्याचे कारण म्हणजे फार मोठा गट फुटेल ही भीती या सरकारला आहे”, असाही दावा राम कदम यांनी केला.

हे विकास विरोधी सरकार

“हे विकास विरोधी सरकार आहे. गेल्या पाच वर्षातील विकास कामांना स्थगिती देऊन महाविकासआघाडी कंत्राटदार आपल्याकडे येण्याची वाट पाहत आहेत का? तसेच कंत्राटदारांनी यांना का भेटावे? विकासाची कामे यांना थांबवता येणार नाही. या सरकारचा आम्ही निषेध करतो”, असं राम कदम म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक कामांना स्थगिती दिल्यामुळे विरोधी पक्ष भाजपकडून शिवसेनेवर निशाणा साधला जात आहे. तसेच शिवसेनेने युती तोडल्यामुळे भाजपनेही आता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीवर लक्ष देऊन महापौर पद मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.