बाटग्यांवरुन ‘सामना’, राऊतांच्या अग्रलेखाला नितेश राणेंचं ट्विटने उत्तर, ‘ही घ्या शिवसेनेच्या बाटग्यांची यादी!’

| Updated on: Aug 02, 2021 | 9:52 AM

नितेश राणे यांनी ट्विटमधून संजय राऊतांना उत्तर दिलं आहे. शिवसेनेतील बाटग्यांच्या महामंडळाची यादी तशी लांब आहे.. पण थोडी माहितीसाठी, असं म्हणत त्यांनी शिवसेनेतील आयारामांची काही नावे सांगितली आहेत.

बाटग्यांवरुन सामना, राऊतांच्या अग्रलेखाला नितेश राणेंचं ट्विटने उत्तर, ही घ्या शिवसेनेच्या बाटग्यांची यादी!
नितेश राणे आणि संजय राऊत
Follow us on

मुंबई : भाजपमध्ये उपऱ्यांना, बाटग्यांना स्थान नव्हतं. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे. त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे, अशी घणाघाती टीका आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी केली होती. त्यांनी नाव जरी घेतलं नसलं तरी त्यांचा रोख प्रामुख्याने नारायण राणे आणि त्यांचे दोन सुपुत्र, पडळकर आणि प्रसाद लाड यांच्याकडे होता. राऊतांनी ‘बाटग्यांवरुन’ केलेली टीका नितेश राणेंना चांगलीच झोंबली आहे. त्यांनी राऊतांना प्रत्त्युत्तर म्हणून ‘शिवसेनेच्या बाटग्यांची यादी!, असं म्हणत शिवसेनेमधल्या आयरामांची यादी प्रसिद्ध केली आहे. (Nitesh Rane Reply Sanjay Raut over Samana Editorial)

नितेश राणेंचं राऊतांना जशास तसं प्रत्युत्तर

नितेश राणे यांनी ट्विटमधून संजय राऊतांना उत्तर दिलं आहे. शिवसेनेतील बाटग्यांच्या महामंडळाची यादी तशी लांब आहे.. पण थोडी माहितीसाठी, असं म्हणत त्यांनी शिवसेनेतील आयारामांची काही नावे सांगितली आहेत. सचिन आहिर – bks ची जबाबदारी… राहुल कनाल – शिर्डी संस्था… आदेश बांदेकर – सिद्धिविनायक संस्था… उदय सामंत – कॅबिनेट मंत्री… अब्दुल सत्तार – मंत्री….  प्रियांका चतुर्वेदी – खासदार

डाके..रावते..रामदास कदम..शिवतारे..राजन साळवी, सुनील शिंदेंसारखे जुने सैनिक दिसणार नाहीत.. स्वतः पवारांची लोम्बते होऊन चमकायचे आणि दुसऱ्यांना मोठी मोठी भाषण द्यायची, अशा शब्दात नितेश राणे यांनी पलटवार केला आहे.

शिवसेना मराठी माणसाची संघटना म्हणे.. मग.. BEST च्या जागा – कनाकीय… Bmc कॉन्ट्रॅक्ट – दिनो…. रात्रीच्या पार्ट्या – पटानी..कपुर..जॅकलिन..
इथे कुठे शाखा प्रमुख दिसत नाहीत? मराठी माणूस दिसत नाही?, असं म्हणत राणेंनी नेहमीच्या आक्षेपाच्या मुद्द्यावरुन सेनेवर टीका केलीय.

राऊत अग्रलेखात काय म्हटले होते?

“भारतीय जनता पक्ष हा कधीकाळी निष्ठावंत, जमिनीवरील कार्यकर्त्यांचा पक्ष होता. एका विचाराने भारलेली हिंदुत्ववादी विचारांची पिढी या पक्षात होती. उपऱ्यांना, बाटग्यांना येथे स्थान नव्हते. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे. त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे.”

आपण किती निष्ठावान यासाठी प्रसंगी तो जिभेवाटे गटार मोकळे करतो

“शिवसेनेच्या स्थापनेपासून सगळ्यात जास्त त्रास कोणी दिला असेल तर तो आपल्यातल्याच बाटग्यांनी. बाटगा जरा जोरातच बांग देतो व आपणच कसे कडक निष्ठावान आहोत यासाठी लक्ष वेधून घेत असतो. प्रसंगी तो जिभेवाटे गटारही मोकळे करून सर्वत्र दुर्गंधी पसरवतो. या दुर्गंधीमुळे आज कमळाचे पावित्र्य व मांगल्य साफ कोमेजून गेले आहे.”

ही आडवाणी- वाजपेयींच्या महान पक्षाची घसरगुंडी आणि शोकांतिका नाहीतर काय?

“1992 च्या ‘बाबरी’ दंगलीत हेच शिवसेना भवन हिंदुत्वाच्या स्वाभिमानाने खंबीरपणे मराठी व हिंदूंचे रक्षणकर्ते म्हणून उभे होते. तेव्हा आजचे हे बाटगे दंगलखोर पाकड्यांना घाबरुन घरातच गोधड्या भिजवत होते. ”आम्ही बाबरी पाडली नाही हो।।”, असा आक्रोश करून बाबरास पाठ दाखवून पळणारे आज या बाटग्यांच्या जीवावर शिवसेनेशी ‘सामना’ करु पाहतात ही आडवाणी – अटलबिहारींच्या महान पक्षाची घसरगुंडी आणि शोकांतिका नाहीतर काय?”

(Nitesh Rane Reply Sanjay Raut over Samana Editorial)

संबंधित बातम्या :

“भाजपमध्ये उपऱ्यांना स्थान नव्हतं, पण आता बाटगे पालखीत आणि मूळ लोक भंगारात, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय”